मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून शुक्रवारी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. "सभागृहाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही," अशा कडक शब्दांत समज देत, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (एटीआर) येत्या सोमवारी सकाळी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दालनात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यावरून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. सभागृहातील गोंधळ आणि सदस्यांच्या भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाने गांभीर्य राखणे बंधनकारक आहे. "संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल सोमवारी (१६ मार्च) कार्यालयीन कामकाज सुरू होताच माझ्या दालनात सादर करावा," असे आदेश त्यांनी सरकारला दिले.






