मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गॅस पुरवठ्यात घट झाल्यामुळे नियमित कामकाज सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या मोठ्या स्थानकांवरील खाद्यान्न स्टॉल्सवर वडापाव आणि समोसे मिळणे कठीण झाले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ताज्या अन्नाऐवजी तयार पाकिटे :
आयआरसीटीसीच्या (IRCTC) शिवडी येथील क्लाउड किचनमधून दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ४,५०० प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र, गॅसअभावी ताज्या अन्नाच्या उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम वंदे भारत, राजधानी आणि तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्यांवर झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी एक्सप्रेससारख्या गाड्यांच्या पेंट्री कारमध्ये आता ‘रेडी-टू-ईट’ (Ready-to-Eat) अर्थात तयार अन्नाचा साठा ठेवला जात आहे. ताज्या जेवणाची कमतरता भासल्यास प्रवाशांना हे पर्याय दिले जातील.
मुंबई लोकलच्या प्रवाशांची मोठी गैरसोय :
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर तळलेले पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज लागते. एलपीजी टंचाईमुळे आता वडापाव, समोसा आणि ब्रेड पकोडा यांसारखे लोकप्रिय पदार्थ गायब होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेच्या ४६० हून अधिक आणि मध्य रेल्वेच्या १९४ स्टॉल्सवर ही समस्या जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाने आता विक्रेत्यांना गॅसऐवजी इंडक्शन (Induction) आणि मायक्रोवेव्ह (Microwave) सारख्या विद्युत उपकरणांचा वापर करून अन्न गरम करण्याचे किंवा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.






