मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. याचाच भाग म्हणून मराठी भाषा भवन’ उभारण्याचे काम सुरू झाले असून ते देशातील सर्वात आकर्षक भाषाभवनांपैकी एक असेल, असे त्यांनी सांगितले.
विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित
विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात भाई जगताप यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कोणती पाऊले उचलली गेली, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठी भाषा विभागाने नेमके कोणते उपक्रम राबवले याबाबत प्रश्न उपस्थित केले.
‘काम झाले नाही’ हा आरोप चुकीचा
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेसाठी साठी कोणतेही काम झाले नाही, हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. मराठीवर हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोपही दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
माशेलकर समितीचा संदर्भ
यावेळी त्यांनी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील माशेलकर समितीचा उल्लेख केला. या समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठीसोबत हिंदी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्या काळातील नेतृत्वाने तो स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र निवडणुका जवळ आल्यावर विरोधकांनी मराठीऐवजी हिंदी सक्ती होत असल्याचा चुकीचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी भाषा भवन आणि जागतिक केंद्र
मराठीच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे सांगताना सामंत यांनी मराठी भाषा भवन उभारणीचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. या प्रकल्पासाठी उपकेंद्र उभारण्याबाबत टेंडर प्रक्रिया देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय मराठीचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी ‘मराठी वैश्विक केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे केंद्र लंडन येथे उभारले जाणार असून राज्य सरकारने यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मराठीला जागतिक स्तरावर मान्यता देण्याचा प्रयत्न
मराठी भाषा जगभर पोहोचावी आणि तिचा गौरव वाढावा, “मराठी सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे आणि जागतिक पातळीवर तिचे स्थान अधिक भक्कम झाले पाहिजे.” हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचे सांगताना उदय सामंत यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले






