मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा दत्ताही तिच्या मुलीसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकली होती. मात्र काही दिवसानंतर ती आपल्या मुलगी सायरासह सुरक्षितपणे भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने त्या काळातील भीतीदायक अनुभव सांगितला.
मध्यपूर्वेत इराण , इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे हवाई हल्ल्यांचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत अनेक भारतीय नागरिकांसह काही चित्रपट कलाकारही यूएईमध्ये अडकले होते. त्यात लारा दत्ता हिचाही समावेश होता. यापूर्वी सोनल चौहान, उर्वशी रौतेला आणि इशा गुप्ता या अभिनेत्री देखील दुबईहून भारतात परतल्या होत्या.
लारा दत्ताने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करून तेथील तणावपूर्ण परिस्थितीची माहिती दिली होती. त्यात तिने सांगितले होते की, ती तिच्या १४ वर्षांच्या मुलीसोबत दुबईमध्ये होती. तिचे पती महेश भूपती हे त्या वेळी कामानिमित्त लंडन येथे होते. मुलगी सायराला नामांकित प्रशिक्षकाकडे टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी ती दुबईला गेली होती.
तणाव वाढत असताना नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लारा दत्ताने सांगितले की, त्या काळात संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांगली व्यवस्था केली होती. तरीही परिस्थिती गंभीर असल्याने तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भारताकडे परतण्याचा निर्णय सोपा नव्हता. लाराच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिची मुलगी जेथे राहत होत्या ते ठिकाण जेबेल अली पोर्ट पासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर होते आणि त्या परिसरात स्फोटांच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्यांनी धोका पत्करत तेथून निघण्याचा निर्णय घेतला.
यानंतर त्यांनी सुमारे दोन तासांचा प्रवास करून फुजैराला पोहोचून तेथून विमानाने भारतात परतण्याचा मार्ग निवडला. लाराने सांगितले की, ते निघण्याच्या आदल्या दिवशीच त्या परिसरातील विमानतळ आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ स्फोट झाले होते. त्यामुळे तो प्रवास अत्यंत भीतीदायक होता.
काही तासांच्या अनिश्चिततेनंतर लारा दत्ता आणि तिची मुलगी सुरक्षितपणे भारतात पोहोचल्या. त्या काळातील अनुभव खूपच तणावपूर्ण आणि थरारक असल्याचे तिने सांगितले.






