उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १३ मार्चपासून विदर्भावर ढग दाटण्यास सुरुवात होईल आणि वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात गेल्या १० दिवसांपासून कमाल तापमानातील चढउतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत. तीन दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले अकोल्याचे तापमान अद्यापही जास्त आहे.
बुधवारी (११ मार्च) अकोल्यात ४१ अंश तापमान नोंदवण्यात आले, तर अमरावतीत ४०.४ अंश आहे. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतही तापमान ४० अंशापर्यंत गेले आहे. नागपूरमध्ये तापमान ३८.४ अंश नोंदवण्यात आले, जे सरासरीपेक्षा ३.२ अंश अधिक आहे. चंद्रपूर ३८.२ अंश, तर वर्धा, वाशिम आणि बुलढाणा ३९ सेल्सीअस सरासरीत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारपर्यंत तापमान वाढलेले राहील आणि उष्ण लाटेचा सामना करावा लागेल.







