Thursday, March 12, 2026

'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

'अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका'

मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी दुरान्वये माझा संबंध नाही.उलट अकारी पडीत जमीन मूळ मालकांना परत मिळाव्यात हीच आपली भूमिका आहे.तसे पत्रही महसूल मंत्र्यांना दिले आहे.परंतू अपुर्या माहीतीवर केलेल्या आरोपाबाबत वडेट्टीवार यांनी माफी मागितली पाहीजे अन्यथा मलाही कायदेशीर मार्ग अवलंबावा लागणार असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

विधानसभेत वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणेच आकारी पडीत शेतकऱ्यांचा संघर्ष मोठा झाला आहे.लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि काॅम्रेड माधवराव गायकवाड यांनी केलेल्या लढ्याला अनेक वर्षानंतर यश आले.यासाठी विधानसभेत ठराव झाले.राष्ट्रपती भवनाची मंजुरी घ्यावी लागली.मोठ्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना जमीनी देण्याचा निर्णय झाला.त्यावेळी असे आरोप झाले नाहीत.

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी अहील्यानगर सोलापूर जिल्ह्यात असल्याने विदर्भातील असलेल्या विजय वडेट्टीवार यांना प्रश्नाची फार जाण नाही.आजही त्यांनी आरोप करण्यापुर्वी मला भेटून माहीती घ्यायला पाहीजे होती.श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांना परत करता येणार नाहीत आशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.महायुती सरकार मध्ये महसूल मंत्री झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने निर्णय केला.मात्र राज्यपाल महोदयांना राष्ट्रपतीच्या अभिप्रायाची गरज आवश्यक वाटत आहे.

हरेगाव मळ्यातील मूळ मालकांना जमीनी परत मिळाव्यात यासाठी लढा सूरू असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की,मूळ मालकांना सिलींग मर्यादेत जमीन परत करणेबाबत निर्णय घ्यावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण स्वता पत्र दिले असून मूळ मालकांचे क्षेत्र निश्चित झाल्यानंतर उरर्वित क्षैत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करणे योग्य होणार असल्याची बाब मंत्रीमंडळ उपसमितीकडेही मांडली आहे.

मात्र कोणतीही पार्श्वभूमी विचारात न घेता किंवा माझा कोणत्याही बाबीशी संबंध नसताना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाचे आश्चर्य वाटत असून एकतर त्यांनी माफी मागावी अन्यथा मला कायदेशीर मार्ग स्विकारावा लागेल असा स्पष्ट इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

Comments
Add Comment