Thursday, March 12, 2026

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून, या गंभीर प्रकरणाची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील अशा टोळ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, काही टोळ्या खासगी व सरकारी प्रसूतीगृहे तसेच आयव्हीएफ (IVF) केंद्रांमधून बालकांच्या जन्माची माहिती मिळवून, आर्थिक आमिष दाखवून पालकांना बालकांची विक्री करण्यास प्रवृत्त करतात. यामध्ये काही रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.

या अनैतिक व्यापाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी सरकार आता एका कठोर कायद्याचा विचार करत असल्याचे आश्वासन मंत्री कदम यांनी दिले. या योजनेचा एक भाग म्हणून, प्रसूतीगृहांमधील नोंदणी प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाईल आणि यासाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाईल, जेणेकरून माहितीची गळती होणार नाही. विशेष म्हणजे, आमदार नार्वेकर यांनी मांडलेल्या सूचनेनुसार, जर एखादा मुख्य आरोपी अटक झाल्यानंतरही त्याचे कुटुंबीय हाच बेकायदेशीर व्यवसाय पुढे चालू ठेवत असतील, तर केवळ आरोपीवरच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सरकार कायद्याचा सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, असेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >