Thursday, March 12, 2026

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्या

मुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचले आहेत, अशी महत्त्वाची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली.

नेमकी घटना काय?

विधान परिषदेत नियम ९३ अन्वये आमदार भाई जगताप यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेत जिवंत काडतुसे आढळून आली होती. आयआयटी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तिथे तपास करण्यासाठी पोलिसांना विशेष पूर्वपरवानगी घ्यावी लागली होती.

आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचे थेट 'बिहार कनेक्शन' उघड झाले असून, संबंधित विद्यार्थी आणि त्याचा मित्र हे दोन्ही बिहारचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आयआयटी पवईमध्ये पाहुण्यांना राहण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत हा मित्र वसतिगृहात मुक्कासाला आला होता. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, त्याच्या बॅगेत सापडलेली ही जिवंत काडतुसे त्याने थेट बिहारमधूनच मुंबईत आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

संपूर्ण साखळी उद्ध्वस्त

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी केवळ काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीलाच नाही, तर त्याला मदत करणाऱ्या संपूर्ण साखळीला (Supply Chain) आपल्या जाळ्यात ओढले आहे. काडतुसे पुरवणाऱ्या मूळ व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असून, ज्या विक्रेत्याकडून ही खरेदी करण्यात आली होती, त्याच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दुव्याचा शोध घेऊन पोलिसांनी हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून, संबंधित सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment