Thursday, March 12, 2026

भारतीय तेलवाहक जहाजांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुरू

भारतीय तेलवाहक जहाजांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुरू

तेहरान : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा केली. यानंतर इराणने भारतीय तेलवाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.

इराणने अमेरिका आणि इस्रायलसह पाश्चात्य देशांसाठी तेलवाहक आणि मालवाहक जहाजांची वाहतूक बंद केली आहे. पण भारताच्या तेलवाहक जहाजांना सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.

पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता तेराव्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा केली. ताज्या चर्चेअंती इराणने अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील जहाजांवर निर्बंध सुरू असतानाही, भारतीय तेलवाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पुष्पक आणि परिमल या दोन भारतीय तेलवाहक जहाजांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार भारतीय तेलवाहक जहाजांना संरक्षणाची हमी मिळाली असताना इतर देशांच्या तेलवाहक जहाजांवर इराणने हल्ले केले आहेत. आतापर्यंत किमान सहा तेलवाहक जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. तेलाच्या आणि मालाच्या सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. भारताने आधीचे नियोजन केल्यामुळे देशासाठीची ७० टक्के तेल आयात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर आहे. यामुळे या आयातीला कोणताही धोका दिसत नाही. उर्वरित आयात जी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणार आहे त्यासाठी इराणने सुरक्षेची हमी दिल्यामुळे भारताची चिंता दूर होण्यास मदत झाली आहे.

याआधी २०१३ मध्ये इराणने भारताच्या देश शांती नावाच्या तेलवाहक जहाजाला अडवून २५ भारतीयांना अटक केली होती. तब्बल एक महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर आखाती देश आणि अमेरिकेच्या दबावामुळे इराणने जहाजाची तसेच भारतीयांची सुटका केली होती. याउलट २०२६ मध्ये इतर देशांची मालवाहक आणि तेलवाहक जहाजं संकटात असताना भारताच्या पुष्पक आणि परिमल या दोन तेलवाहक जहाजांना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment