Wednesday, March 11, 2026

ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळणार; साताऱ्यातील आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची गृहराज्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा

ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळणार; साताऱ्यातील आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची गृहराज्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा

मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी आणि पाचुपतेवाडी येथे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ निर्मितीच्या कारखान्याप्रकरणी राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत असून, या प्रकरणातील सर्व ११ आरोपींवर 'मकोका' (MCOCA) लावण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

ड्रग्जची साखळी तोडण्यासाठी 'टास्क फोर्स' सज्ज

साताऱ्यातील जावळी तालुक्यात झालेल्या या कारवाईवरून आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपींना राजाश्रय मिळतोय का? आणि एमडी ड्रग्जचे वाढते जाळे रोखण्यासाठी शासन काय करत आहे, असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, "राज्यात अमली पदार्थांविरोधात लढा देण्यासाठी विशेष 'टास्क फोर्स' तयार करण्यात आला आहे. केवळ अमली पदार्थ जप्त करणे हेच आमचे उद्दिष्ट नसून, त्याची निर्मिती करणारे कारखाने आणि केमिकल सप्लाय करणारी संपूर्ण साखळी (Chain) उद्ध्वस्त करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत."

या चर्चेत सहभागी होताना आमदार सतेज पाटील यांनीही ड्रग्ज तस्करीवर चिंता व्यक्त केली. केवळ कारखान्यांवर कारवाई न करता मूळ केमिकल पुरवठादारांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर मंत्र्यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील मुलुंड परिसरातूनही एका मोठ्या ड्रग्ज सप्लायरला अटक करण्यात आली असून, ग्रामीण भागातील बंद कारखान्यांमध्ये होणाऱ्या अशा अवैध उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताबाबत सविस्तर चर्चेची मागणी

याच दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात विधानपरिषदेत दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्याची आक्रमक मागणी केली. या विषयावरून सभागृहात काही वेळ खडाजंगी पाहायला मिळाली.

राज्यातील वसतिगृहांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

आखाती देशांमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचे पडसाद राज्यातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्येही उमटले असून, तेथील जेवणाचे प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. यावर सभापती राम शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार सचिन अहिर यांनीही गॅस सिलिंडरचे वाढते दर आणि इंधनाच्या साठेबाजीवर लक्ष वेधले. "गॅस आणि पेट्रोलचा साठा करून काही ठिकाणी सिंडिकेट तयार होत असून, त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा चुलीकडे वळत आहेत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅसचा तुटवडा कमी करावा, अशी विनंती त्यांनी केली.

या गंभीर मुद्द्यावर सभापती राम शिंदे यांनी सरकारला निर्देश दिले की, ज्या ज्या ठिकाणी शासकीय किंवा खासगी वसतिगृहे आहेत, तेथे विद्यार्थ्यांच्या जेवणाची अडचण भासणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. इंधन आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

Comments
Add Comment