मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान योगदानाचा आणि प्रशासकीय अनुभवाचा विचार करून राज्य सरकारने त्यांना पुन्हा शासन सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खाडे यांच्या विनंतीवरून, त्यांनी यापूर्वी दिलेला राजीनामा मागे घेण्यास सरकारने 'विशेष बाब' म्हणून मंजुरी दिली असून नियुक्तीचा शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.
मूळचे कोल्हापूरचे असलेले विरधवल खाडे यांनी महसूल विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता, जो ३० सप्टेंबर २०२४ रोजी स्वीकारण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय सेवेत पुन्हा कार्यरत होण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी अर्जाद्वारे विनंती केली होती. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. खाडे यांना तहसीलदार पदावर पुनश्च रुजू करण्यात आले असून, पुढील पदस्थापनेचे आदेश मिळेपर्यंत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण येथे उपस्थित राहून कामकाज पाहण्याचे निर्देश दिले आहेत.