मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे आता पोलिसांना महागात पडणार आहे. प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांना दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात प्रलंबित ई-चलान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून ‘दंड आत्ताच भरा, अन्यथा वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू’ अशी दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिसांच्या या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
'एसओपी'चे पालन अनिवार्य
वाहतूक विभागाने ई-चलान दंड वसुलीसाठी यापूर्वीच 'आदर्श कार्यप्रणाली' (एसओपी) जाहीर केली आहे. यानुसार, जर वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल, तरच तो स्वीकारावा. वाहन जप्तीसारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात यावी. रस्त्यात वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिस्तभंगाची कारवाई करणार
ग्राउंडवर काम करणारे पोलीस कर्मचारी अनेकदा वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जनतेला नाहक त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होत असल्याचे नव्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार या निर्देशांचे उल्लंघन करतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.







