अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला.सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.
बीसीसीआयकडून १३१ कोटींचे बक्षीस जाहीर
या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी ही घोषणा केली. या बक्षिसात संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक मंडळींचा समावेश असणार असून रक्कम सर्वांना समसमान पद्धतीने वाटली जाणार आहे.
प्रत्येक खेळाडूला कोटींचा लाभ
माहितीनुसार, टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला सुमारे ६ ते ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात आनंदाचे वातावरण असून कर्णधार सूर्यासह संजू सॅमसन यालाही समान बक्षीस मिळणार आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात संघाचे कौतुक करताना म्हटले की, “टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही अशाच यशासाठी शुभेच्छा.”
यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यंदा त्यापेक्षा ६ कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत.
अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. या विजयासह टी-२० विश्वचषक कायम राखणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनण्याचा मान भारताला मिळाला.
इतकेच नव्हे तर भारत आता तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.