Tuesday, March 10, 2026

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी समुद्रात तसेच जमिनीवर ठिकठिकाणी इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय केले आहेत. या जॅमरमुळे इंटरनेट ठप्प होणे, मोबाईलचे नेटवर्क गायब होणे, फोन न लागणे किंवा फोन न येणे या समस्या जाणवू लागल्या आहेत. समुद्रात सक्रीय असलेल्या जॅमरमुळे जहाजांची वाहतूक पुरती कोलमडली आहे.

समुद्रात असताना प्रत्येक जहाज इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम वापरते. अक्षांश - रेखांशांच्या आधारे इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम प्रत्येक जहाजाचे समुद्रातले भौगोलिक स्थान निश्चित करते. यामुळे जहाज हाताळणाऱ्यांना आपण नेमके कुठे आहोत आणि कसा प्रवास करत आहोत याची माहिती सतत मिळत असते. हीच माहिती जवळच्या देशांतील जहाजांच्या नियंत्रण कक्षांनाही मिळत असते. या माहितीचा वापर करून आणि जवळच्या जहाजांच्या तसेच जवळ असलेल्या देशाच्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून प्रत्येक जहाज मार्गक्रमण करत असते.

समुद्रात जॅमर सक्रीय असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक नॅव्हिगेशन सिस्टिम विस्कळीत झाली आहे. यामुळे हजारो जहाजांना त्यांचे भौगोलिक स्थान समजणे अशक्य झाले आहे. शिवाय जवळच्या जहाजांशी आणि जवळच्या देशाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. या समस्यांमुळे जहाजांची वाहतूक पुरती विस्कळीत झाली आहे. अनेक जहाजांनी यंत्रणा सुरळीत होईपर्यंत आहोत तिथेच थांबणे अथवा साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या एखाद्या जवळच्या जहाजाच्या आसपास राहून मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे. तर काही जहाजांनी अनुभवांच्या आधारे अंदाजे मार्गक्रमण सुरू केले आहे. यामुळे सागरी मार्गांवरील जहाजांच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कोणते जहाज कधी कोणता किनारा गाठणार याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. याचा जहाज वाहतुकीशी संलग्न सर्व व्यवसायांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून २६ - २७ फेब्रुवारी दरम्यान १०० पेक्षा जास्त जहाजांनी प्रवास केला होता. पण ४ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून फक्त पाच जहाजांनी प्रवास केला. आता तर होर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकी किती जहाजं आहेत आणि ती कुठे आहेत याचे तपशील समजणे अशक्य झाले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध लवकर थांबले नाही तर समुद्रात काही जहाजांचा अपघात होण्याचा तसेच काही जहाज भरकटण्याचा धोका आहे. यामुळे सागरी मार्गाने होणारी सर्व मालवाहतूक आणि तेलवाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.

Comments
Add Comment