Tuesday, March 10, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार

भारतीय क्रिकेट संघाचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार

 शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली महापौरांकडे मागणी

मुंबई : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेतर्फे संघाचा भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक व महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली आहे.

यासंदर्भात घोले यांनी १० मार्च २०२६ रोजी महापौरांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवत इतिहास घडवला आहे. तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावताना सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी केल्याने देशाचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले आहे. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे देशभरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी हा विजय प्रेरणादायी ठरणार असल्याचेही चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुंबई ही देशाची क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अशा ऐतिहासिक यशाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेतर्फे भारतीय क्रिकेट संघाचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मुंबईकरांना भारतीय संघाच्या या मोठ्या यशाचा गौरव करण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही घोले यांनी महापौरांना केली आहे.

Comments
Add Comment