मुंबई: भारताने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ रनने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. पण या यशामागे एक मोठी आणि भावूक गोष्ट दडलेली आहे. काही महिन्यांपूर्वी संजू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाचपडत होता. मानसिकदृष्ट्या खचला होता, तोच आज जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून समोर आला आहे. संजूच्या या पुनरागमनामागे क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा खूप मोठा हात आहे.
खचलेल्या संजूला सचिनचा आधार
वर्ल्ड कपच्या काही काळ आधी संजू सॅमसन अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. त्याची बॅट चालत नव्हती आणि संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला मोठी धडपड करावी लागत होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजनंतर तर तो आतून पूर्णपणे तुटला होता.
आपल्याला आता संधी मिळेल की नाही, इथपासून ते करिअर संपल्याच्या विचारांपर्यंत तो पोहोचला होता. अशा कठीण काळात संजूने थेट सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधला. सचिनने त्याला केवळ मार्गदर्शन केले नाही, तर त्याच्याशी तासनतास संवाद साधून त्याचा आत्मविश्वास परत मिळवून दिला. संजू सांगतो की, सचिन सर सारख्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणे हे भाग्याचे आहे आणि त्यांच्यामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो.
संजूचा प्रवास आणि संघर्ष
संजू सॅमसनसाठी हा प्रवास सोपा नव्हता. २०२४ च्या वर्ल्ड कप टीममध्ये असूनही त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नव्हती. तेव्हापासून त्याने स्वतःला तयार करायला सुरुवात केली होती. तो सतत सराव करायचा आणि एक दिवस आपण देशासाठी मोठी कामगिरी करू, असे व्हिज्युअलाइज करायचा.
या वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्येही त्याला केवळ एकच मॅच मिळाली होती. पण काही अनपेक्षित परिस्थितीमुळे त्याला पुढच्या सामन्यांत संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध त्याने ८९ रनची धडाकेबाज खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
संजूने या स्पर्धेच्या शेवटच्या ३ मॅचमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ती पाहून अख्खे जग थक्क झाले. इंग्लंड विरुद्धची सेमीफायनल असो किंवा न्यूझीलंड विरुद्धची फायनल, संजूने आपल्या आक्रमक खेळाने प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडला. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार मिळाल्यानंतर संजू खूप भावूक झाला होता. तो म्हणाला की, माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्द नाहीत आणि व्यक्त व्हायला भावनाही उरल्या नाहीत. देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळेच नियोजन केले होते आणि ध्येय सोडले नाही म्हणून मला हे फळ मिळाले आहे.
इतके मोठे यश मिळाल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न जेव्हा संजूला विचारला गेला, तेव्हा तो खूप संयमाने बोलला. तो म्हणाला की, माझ्यासाठी हे यश खूप मोठे आहे आणि सध्या मला फक्त या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. येणाऱ्या काही दिवसांत शांतपणे विचार करून पुढचे नियोजन करेन. संजूच्या या यशाने हे सिद्ध केले की, तुमच्याकडे जिद्द असेल आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले, तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता.







