- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले असून, या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करणारा ठराव आज विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय संघाने अंतिम सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे टी-२० इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मजबूत पायाभरणी केली. विशेषतः संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केलेल्या प्रभावी फलंदाजीमुळे भारताला मोठा धावसंख्येचा टप्पा गाठता आला. या धावसंख्येच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडवर पूर्ण दबाव ठेवत सामना एकतर्फी केला.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण मालिकेत भेदक मारा करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. अंतिम सामन्यातही त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला रोखत प्रभावी कामगिरी केली. मालिकेत भारताने केवळ एकच सामना गमावला असून उर्वरित सर्व सामन्यांत ठोस विजय मिळवत ही मालिका जिंकली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या विजयात कर्णधार सुर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने उत्कृष्ट सामूहिक खेळ सादर केला. संघातील मुंबईच्या खेळाडूंनीही लक्षणीय योगदान दिल्याचे नमूद करत त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय संघाने मिळवलेला हा दिमाखदार विजय देशासाठी अभिमानास्पद असून राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज अभिनंदनाचा ठराव मांडून खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







