Monday, March 9, 2026

इस्रायल इराण युद्धामुळे तीव्र पाणीसंकट निर्माण होण्याची भीती

इस्रायल इराण युद्धामुळे तीव्र पाणीसंकट निर्माण होण्याची भीती

मुंबई: पेट्रोल, गॅस गरवाढीचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पण इस्रायल इराणचं हे युद्ध आता थेट पाण्यावरच वार करणार आणि आखातातले देश तहानलेले राहणार, अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. प्रत्यक्षात आखातात पेट्रोल भरपूर असलं तरी पाण्याची टंचाई आहे. युद्ध सुरूच राहिलं तर आखातातल्या देशांमध्ये तीव्र पाणीसंकट निर्माण होण्याची भीती आहे. कुवेत, ओमान, सौदी अरेबियासारखे देशांना पिण्याचं पाणी डिस्टिलेशन प्लांट म्हणजे पाणी शुद्धीकरण प्रकल्पांच्या मदतीनं मिळतं. युद्धामध्ये या डिस्टिलरी प्लांट्सना लक्ष्य करण्यात आलं तर खाडीला लागून असलेल्या देशांवर मोठं पाणीसंकट येण्याची भीती आहे.

पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणचा हल्ला...

तेल, गॅस पाठोपाठ आता पाण्याला टार्गेट केलं जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. खाडीला लागून असलेल्या आखातातल्या बहुतांश देशांमध्ये समुद्राचं शुद्ध केलेलं पाणी येतं. समुद्राच्या पाण्यातून क्षार हटवून पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी आखाती देशांमध्ये मोठमोठे डिस्टिलरी प्लांटस म्हणजे मोठे पाणी शुद्धीकरण प्रकल्प असतात. आता हेच प्लांट्स ड्रोन आणि मिसाईल्सच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जात आहे. अशाच एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणनं हल्ला केल्याचा दावा बहारीननं केला आहे.

पर्शियन खाडीच्या किनाऱ्यावर शेकडो पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. खाडीला लागून असलेले देश पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवरच अवलंबून असतात. या प्रकल्पांमध्ये समुद्राच्या पाण्यातून क्षार आणि मीठ हटवून पाणी शुद्ध केलं जातं. या प्लाट्सना लक्ष्य करण्यात आलं तर खाडीला लागून असलेल्या देशांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कुवेतमध्ये ९० टक्के पाणी, ओमानमधलं ८६ टक्के पाणी, तर सौदी अरेबियातलं ७० टक्के पिण्याचं पाणी याच शुद्धीकरण प्रकल्पांतून मिळतं.

इराण-इस्रायल युद्धामुळे सर्वाधिक फटका तेलाच्या वाहतुकीला बसला आहे. तेलाची टंचाई निर्माण झालीय आणि तेलाचे दर भडकलेत. जगातली एक तृतीयांश तेल वाहतूक याच आखातातून केली जाते. मात्र आता पुढचं संकट हे पाणी असेल, असा इशारा युद्ध तज्ज्ञांनी दिला आहे. आता युद्ध भडकल्यावर पाणी शुद्धीकरणाचे हे प्रकल्प सुरक्षित ठेवणं हे आखातातल्या देशांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आतापर्यंत झालेल्या युद्धात पाणी शुद्धीकरण प्रकल्पांजवळ अनेक हल्ले करण्यात आले. २ मार्चला इराणनं दुबईच्या जेबेल अली बंदरावर हल्ला केला. इथून दुबईचा सगळ्यात मोठा पाणी शुद्धीकरण प्रकल्प जवळच आहे. याच प्रकल्पातून दुबईला पाणी मिळतं. युएईमधल्या फुजैराह एफ-1 पॉवर आणि वॉटर कॉम्प्लेक्स, दोहाजवळच्या पाणीशुद्धीकरण प्रकल्पांच्या जवळही हल्ला झाला आहे. पाणी शुदधीकरण प्रकल्पामधल्या इनटेक सिस्टम, ट्रीटमेंट फॅसिलिटी किंवा एनर्जी सप्लाय यापैकी कुठल्याही यंत्रणेवर हल्ला झाला तरी संपूर्ण पाणीसाठा आणि पाणीशुद्धीकरण प्रकल्प धोक्यात येईल. इराण पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर अवलंबून नाही. नद्या आणि धरणांमधल्या पाण्यामुळे इराणची तहान भागते. त्यामुळे इराणकडून आखातातल्या देशांमधल्या या पाणीप्रकल्पांवर हल्ले होऊ शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >