Tuesday, March 10, 2026

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरले. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आले नव्हते. दोन वर्षांपूर्वी रोहितसेनेचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर रचला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी साकारत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. तिलक वर्माने लॉकी फर्ग्युसनचा झेल घेताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांतच आटोपला.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशनच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालं. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. मात्र हे सर्व विसरुन इशान किशन मैदानात उतरला आणि आक्रमक अर्धशतक ठोकलं. अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशनने आकाशात बघत बहिणीला श्रद्धांजली वाहिली. वैष्णवी सिंह आणि ऋत्विक ठाकूर असं मृत व्यक्तींची नावं आहेत.

काय म्हणाला इशान ?

इशान किशन म्हणाला, फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावले. मी तिच्यासाठी खेळलो, मी हार्दिक पांड्यासोबत बोललो आणि त्याने संघाला प्राधान्य देण्यास सांगितले. मी हा विजय तिला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, असंही इशान किशन म्हणाला. दरम्यान, इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

बुमराहच्या वेगाची जादू :

फलंदाजांनी आपले काम योग्यरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी गोलंदाजांवर होती. आव्हान मोठं होतं. पण न्यूझीलंडच्या ताफ्यातही एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज होते. त्यांना लवकर बाद केलं नसतं. तर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजीला बोलवलं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद करत माघारी धाडलं. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा खर्च करून ४ गडी बाद केले.

Comments
Add Comment