मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२०विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन केलं. यासह टीम इंडियावर सर्व स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन पोस्ट केलं, "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं हार्दिक अभिनंदन! हा शानदार विजय असाधारण कौशल्य, दृढनिश्चय आणि टीमवर्कचा दाखला आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत असाधारणपणे चांगली कामगिरी केली. या विजयानं प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानानं आणि आनंदानं भरुन गेलं आहे. शाबास, टीम इंडिया!"
गृहमंत्र्यांनी काय लिहिलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिलं, "काय विजय! विश्वविजेत्या टीम इंडियाला सलाम. संपूर्ण स्पर्धेत तुमच्या चमकदार कामगिरीनं आणि प्रचंड उत्साहानं देशाला अभिमान आणि सन्मान मिळवून दिला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन."
टीम इंडियाच्या विजयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा, रोमांचकारी, चमकदार, आश्चर्यकारक, प्रचंड! २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकातील ऐतिहासिक आणि स्मारकीय विजयाबद्दल टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन! मेन इन ब्लू संघाला इतक्या अचूकतेने विजयी होताना पाहणे हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि सामूहिक आनंदाचा क्षण होता. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी असाधारण कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवला, ज्यामुळे देशाला अभिमान वाटला. वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आणि आणखी एक विक्रम रचल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सूर्यकुमार यादव यांच्या संयोजित कर्णधारपदाचे आणि संपूर्ण संघाच्या टीमवर्कचे कौतुक"
टीम इंडियाच्या विजयावर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
टीम इंडियाच्या विजयावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, "अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मोठ्या अभिमानाने विश्वचषकावर कोरलं देशाचं नाव... आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक साधत रचला इतिहास... आज झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारतीय क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीकरता आमंत्रित केले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या स्फोटक फलंदाजीने भारतीय संघाला उत्तम सुरुवात करून दिली. त्यानंतर ईशान किशनने त्यांना उत्कृष्ट साथ देत धावसंख्येला आकार दिला. एका षटकात तीन विकेट घेत न्यूझीलंडच्या नीशमने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शीवम दुबे, हार्दिक पांड्या आणि तीलक वर्मा यांनी भारतीय फलंदाजी सावरत न्यूझीलंड संघासमोर २५६ धावांचे आव्हान उभे केले. त्यानंतर गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने चार आणि अक्षर पटेलने तीन धक्के देत न्यूझीलंड फलंदाजीला सुरुंग लावला. अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती व अभिषेक शर्मा यांनी उत्तम साथ देत न्यूझीलंड क्रिकेट संघाला १५९ धावांवर गुंडाळले. उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक चषकात विजयाची हॅट्ट्रिक साधत इतिहास रचला आहे. देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."
टीम इंडियाच्या विजयावर काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री पवार?
टीम इंडियाच्या विजयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "इतिहास रचला. भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या दमदार फलंदाजीमुळे सुरुवातीलाच संघाला विजय मिळवून दिला आणि भारताला नियंत्रणात आणले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीमुळे विरोधी संघावर दबाव कमी झाला नाही. सर्व विभागांमध्ये चांगल्या कामगिरीमुळे भारताने घरच्या मैदानावर विजय मिळवला. टीम इंडिया पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकत असल्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी अभिमानाचा क्षण."