अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकून आपल्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. सूर्यकुमार यादवनं कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरत असल्याचे सांगत अभिषेक शर्मावर भरवसा कायम दाखवला. त्यानेही संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत फायनलमध्ये विक्रमी खेळी साकारली. १८ चेंडूत अर्धशतक साजरे करत त्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले.
याआधी फिन ॲलन याने ईडन गार्डन्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १९ चेंडूत अर्धशतक ठोकून हा विक्रम केला होता. पण आता हा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे, ज्याने संपूर्ण स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर अंतिम फेरीसाठी आपले सर्वोत्तम अर्धशतक झळकावले. अभिषेकने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतकही नोंदवले.
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम हेनरिक क्लासेन यांच्या नावावर होता. त्याने २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये भारताविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा भयावह स्वप्नासारखी राहिली. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला संघाबाहेर करा, अशी मागणी झाली. पण शेवटी याच पठ्ठ्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक झळावण्याचा पराक्रम करुन दाखवला.







