मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारताने इंग्लंडचा, तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन संघापैकी कोणता संघ वर्ल्ड कप उंचवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येकी १४ वेळा फायनल खेळली आहे. या आयसीसी स्पर्धांमध्ये वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश आहे. रविवारी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर तो हा विक्रम मोडणार आहे. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील आपला १५ वा अंतिम सामना खेळणार आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाने १४ पैकी १० फायनल जिंकल्या आहेत. तर भारताने १७ पैकी ७ फायनल जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ ची फायनल ही पावसामुळे रद्द करण्यात आली होती.
आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारे संघ
- ऑस्ट्रेलिया - १४ सामने - १० विजय
- भारत - १४ सामने - ७ विजय
- वेस्ट इंडिज - ८ सामने ५ विजय
- इंग्लंड - ९ सामने ३ विजय
- श्रीलंका - ७ सामने ३ विजय
- न्यूझीलंड - ७ सामने २ विजय
- पाकिस्तान - ६ सामने ३ विजय
- दक्षिण अफ्रिका - ३ सामने २ विजय
आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताचे विजय
- वनडे विश्वचषक १९८३: भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला.
- चॅम्पियन्स ट्रॉफी २००२: भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते.
- टी-२० विश्वचषक २००७: भारताने पाकिस्तानला मात दिली.
- वनडे विश्वचषक २०११: भारताने श्रीलंकेचा पराभव केला.
- चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३: भारताने इंग्लंडला धूळ चारली.
- टी-२० विश्वचषक २०२४: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले.
- चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.







