मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे.
अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला ९६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.
या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.







