मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर 'रीवा एक्सप्रेस'मध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांचे नाक कापण्याचा आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आशुतोष ब्रह्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांनी या कटामागे थेट शंकराचार्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
आशुतोष ब्रह्मचारी हे रविवारी (८ मार्च) रीवा एक्सप्रेसने गाझियाबादहून प्रयागराजच्या दिशेने प्रवास करत होते. ते ट्रेनच्या फर्स्ट एसी (1st AC) कोचमध्ये बसलेले असताना, पहाटे ५ च्या सुमारास ट्रेन फतेहपूर आणि सिराथू रेल्वे स्थानकाच्या दरम्यान होती. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोराने त्यांचे नाक कापण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर अनेक वार केले.
बाथरूममध्ये लपून वाचवला जीव अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आशुतोष ब्रह्मचारी रक्तबंबाळ झाले होते. त्यांनी आरडाओरडा करत कसाबसा आपला जीव वाचवला आणि स्वतःला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये कोंडून घेतले. तिथूनच त्यांनी तातडीने जीआरपी (रेल्वे पोलीस) कंट्रोल रूमला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
शंकराचार्यांवर गंभीर आरोप आशुतोष ब्रह्मचारी यांनी या हल्ल्यासाठी थेट स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांचे शिष्य मुकुंदानंद यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन बटूच्या लैंगिक शोषणाप्रकरणी (पॉक्सो) मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर एफआयआर दाखल केली होती. याचाच बदला घेण्यासाठी प्रकाश उपाध्याय, अरविंद आणि मथुरा येथील दिनेश शर्मा यांनी माझे नाक कापण्याचा कट रचला. "नाक कापणाऱ्याला एक लाख रुपये देऊ," अशी घोषणा दिनेश शर्मा यांनी केल्याचा दावाही आशुतोष यांनी केला आहे.
या घटनेमुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जीआरपीने आशुतोष ब्रह्मचारी यांच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) नोंदवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होता आणि तो ट्रेनमध्ये कसा शिरला, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जखमी आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.







