Saturday, March 7, 2026

Women Day 2026 : भावविश्वातील अबोल परिवर्तन

Women Day 2026 : भावविश्वातील अबोल परिवर्तन

चिंतन; डॉ. नीना सावंत

भारतीय स्त्रीच्या प्रवासाबद्दल आपण अनेकदा संसार, शिक्षण, नोकरी, राजकारणातील सहभाग किंवा नेतृत्व या टप्प्यांतून बोलतो. पण या दृश्यमान बदलांच्या पलीकडे एक अधिक खोल आणि शांत परिवर्तन घडले आहे - तिच्या भावविश्वात.

सहनशीलतेतून संवादाकडे, कर्तव्यापासून निवडीकडे आणि मौनातून स्व-अभिव्यक्तीकडे - भारतीय स्त्रीच्या मनोविश्वाचा प्रवास अनेक पिढ्यांतून घडत आला आहे. त्याबरोबर समाजातील होणारे बदल सुद्धा तिने स्वीकारले आणि स्वतःला घडवले.

सहन करणारी पिढी/आजीची पिढी (१९४० च्या दशकात जन्मलेली) विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या स्त्रियांचे आयुष्य कुटुंब, विवाह आणि कर्तव्य यांच्या चौकटीत बांधलेले होते. भावना दडपणे ही ताकद मानली जात होती. त्याग हा गुण होता. वैयक्तिक इच्छेपेक्षा कुटुंबाच्या गरजा महत्त्वाच्या होत्या. मी माझ्या आई, अाज्जी, मावशी इत्यादी ना बघत बघत वाढले आणि माझ्या मनात कधी नाही आले की आईने स्वतःसाठी काही करायला पाहिजे. त्या सर्वांनी घरी असणे हीच समज. ही पिढी सहन करणारी होती. कुटुंबासाठी सगळे काही करणारी होती आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी होती. या पिढीत संघर्ष नव्हता असेही नाही. आपण सावित्रीबाई फुले यासारख्या विद्वान महिलेचे समाजाच्या विरोधाला सामोरे जात मुलींच्या शिक्षणाचा पाया कसा रचला हे बघितले,ज्यामुळे आज आपल्या सर्वांना शिक्षण मिळाले तसेच इंदिरा गांधींनी पुरुषप्रधान राजकारणात देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास होता, पण तो संयमित आणि स्थिर स्वरूपात व्यक्त झाला.

या पिढीने प्रचंड सहनशक्ती विकसित केली. अनेक स्त्रियांनी आपले दुःख आतमध्येच ठेवले. त्यांची ओळख नात्यांमधून घडत होती - मुलगी, बहीण,पत्नी, आई.

मुंबईतील ८२ वर्षांच्या एका आजी सांगतात,“आम्ही ‘मला काय हवं आहे?’ असा विचारच केला नाही. ‘घराला काय हवं आहे?’ हेच आमचं समाधान होतं. माझ्या वाटेचा घास माझ्या बाळाला मिळाला, त्यातच माझी भूक मिटली.”

या पिढीतील अनेक स्त्रियांसाठी लैंगिकता ही विवाह आणि मातृत्वाशी घट्ट जोडलेली होती. भावनिक जवळीक अनेकदा वर्षानुवर्षांच्या सहजीवनानंतर हळूहळू विकसित होत असे. संयुक्त कुटुंबांमध्ये गोपनीयता जवळजवळ नव्हती आणि एखाद्या स्त्रीने स्वतःच्या लैंगिक इच्छांविषयी उघडपणे बोलणे हे जवळजवळ अकल्पनीय मानले जात असे.

“अशा गोष्टींबद्दल आम्ही कधी बोलतच नव्हतो. लग्न म्हणजे जबाबदारी. प्रेम आणि समजूत नंतर आली - आली तर.”

समतोल साधणारी पिढी/आईची पिढी (१९७० च्या दशकात जन्मलेली) स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी वाढू लागल्या. १९६० ते १९८० या काळातील स्त्रिया दोन विश्वांत जगत होत्या - घर आणि बाहेरचे काम.

जागतिक स्तरावर ‘फेमिनिज्म’चा प्रभाव होता, तर भारतात संविधानिक समानता आणि शहरीकरणामुळे स्त्रियांच्या अपेक्षा बदलत होत्या. पी. टी. उषा यांनी क्रीडाक्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केले. इला भट यांनी असंघटित क्षेत्रातील स्त्रियांना संघटित करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. स्त्रिया आता थोडा फार स्वतःचा विचार करू लागल्या. ही पिढी परंपरेला नाकारत नव्हती; ती तिच्याशी संवाद साधत होती आणि सामाजिक पातळीवर काही बदल करत होती. ६७ वर्षांच्या निवृत्त मुख्याध्यापिका सांगतात, “आम्हाला करिअर हवं होतं, पण चांगली सूनही व्हायचं होतं. मुलं आजारी पडली की अपराधी वाटायचं. घरी राहिलो तर शिक्षण वाया गेल्यासारखं वाटायचं.”......

की अपराधी वाटायचं. घरी राहिलो तर शिक्षण वाया गेल्यासारखं वाटायचं.” पण बऱ्याच घरात स्त्रीला मोकळेपणा नि विचार मांडायची संधी अजून मिळाली नव्हती. जरी स्त्री घराबाहेर पडली तरी तिला स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळाले नव्हते. ही पिढी सतत तारेवरची कसरत करत होती. त्यांच्या जिद्दीचा आधार होता - समतोल. या पिढीतील स्त्रिया अनेकदा दोन जगांमध्ये जगत होत्या-एकीकडे पारंपरिक अपेक्षा आणि दुसरीकडे वाढती आत्मजाणीव. शिक्षण, नोकरी आणि नव्या कल्पनांचा परिचय यामुळे त्यांच्या विचारविश्वात बदल घडू लागला. अनेकांना लैंगिकता ही भावनिक भागीदारीचा एक भाग आहे, असे समजू लागले, तरीही सामाजिक नियमांमुळे तिची उघड अभिव्यक्ती मर्यादितच राहिली. “आमच्याकडे त्याबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी शब्दच नव्हते; पण लग्नात फक्त कर्तव्य नाही, तर भावनिक जवळीकही आवश्यक आहे हे आम्हाला हळूहळू जाणवू लागले.” महत्त्वाकांक्षेची पिढी/मुलींची पिढी (२००० नंतर जन्मलेली) १९९० नंतरच्या आर्थिक उदारीकरणामुळे भारतीय समाजात मोठा बदल झाला. कॉर्पोरेट क्षेत्र वाढले, जागतिक संधी उपलब्ध झाल्या आणि आर्थिक स्वातंत्र्य अधिक सुलभ झाले. अनेक मुली डॉक्टर, इंजिनीअर, बँकर, वकील, शिक्षक इत्यादी म्हणून आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. आता स्त्रिया मत मांडणी करू लागल्या आणि उत्तम प्रकारे घर आणि नोकरी सांभाळू लागल्या. यश ही आता अपवादात्मक गोष्ट राहिली नव्हती; ती अपेक्षा बनली होती. ४५ वर्षांच्या एका कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचे शब्द, विचार करायला लावतात: “आम्हाला सांगितलं गेलं की, तुम्ही सगळं करू शकता. पण सगळं उत्तम प्रकारे करणं किती थकवणारं असतं, हे कुणी सांगितलं नाही.” या पिढीने मानसिक आरोग्याविषयी बोलायला सुरुवात केली. भावनिक शब्दसंग्रह वाढला - पण तणावही वाढला आणि स्त्रीला ताण कमी करण्यासाठी घरी मदत कमी मिळाली. बऱ्याच गोष्टींमध्ये समानता नव्हती आणि तिची लढाई चालूच होती. “आमच्या पिढीसाठी संमती, आराम आणि समानता या अत्यावश्यक गोष्टी आहेत. नातेसंबंधात दोन्ही व्यक्तींचा आदर असला पाहिजे.” आजची स्त्री : जाणीव आणि ठामपणा आजची तरुण भारतीय स्त्री डिजिटल युगात वाढली आहे. तिला सीमारेषा आखण्याची, संमतीची आणि मानसिक आरोग्याची भाषा अवगत आहे. ती असमानता किंवा अपमान सहन करण्यास तयार नाही. आजच्या तरुण स्त्रिया लैंगिकतेविषयी निवड, मर्यादा आणि परस्पर आदर या संकल्पनांच्या संदर्भात अधिक मोकळेपणाने बोलतात. सोशल मीडिया, जागतिक चर्चा आणि स्त्रीवादी चळवळींमुळे लैंगिक आरोग्य आणि स्वायत्ततेविषयीचे संभाषण अधिक सामान्य झाले. २८ वर्षांची एक वकील म्हणते, “मी परंपरेचा आदर करते, पण तिच्यासाठी स्वतःला लहान करणार नाही. नातं म्हणजे समानता.” आजची स्त्री स्वतःची ओळख विवाहापलीकडे घडवते. करिअर ही पर्याय नसून पाया आहे. भावनिक जुळवणूक नात्यांत महत्त्वाची आहे. पण स्वातंत्र्याबरोबर दबावही येतो-सतत तुलना, असंख्य पर्यायांमुळे होणारा संभ्रम आणि परिपूर्णतेची अपेक्षा. काय बदललं आणि काय तसंच राहिलं? भारतीय स्त्रीची जिद्द कायम आहे, पण तिचं रूप बदललं आहे. “पूर्वीची जिद्द होती सहन करण्याची. नंतरची जिद्द होती समतोल साधण्याची. आजची जिद्द आहे स्वतःसाठी उभं राहण्याची.”

भावना दडपल्या जात नव्हत्या-त्या व्यक्त होत नव्हत्या. आज त्या व्यक्त होतात, नाव दिलं जातं आणि गरज पडल्यास उपचारही घेतले जातात. अनेक शहरी घरांत आजी, आई आणि मुलगी - तिन्ही पिढ्या एकत्र राहतात. त्यांचे मतभेद अध:पतनाचे चिन्ह नाहीत; ते संक्रमणाचे संकेत आहेत. भारतीय स्त्रीचा प्रवास हा कमकुवतपणातून ताकदीकडे जाणारा रेषीय प्रवास नाही. ताकद नेहमीच होती. बदल झाला तो परवानगीचा-बोलण्याची, निवड करण्याची, नाकारण्याची, मदत मागण्याची, स्वतःची व्याख्या करण्याची. प्रत्येक पिढीने आपापला अदृश्य भार वाहिला आहे. आजची स्त्री निवडीचा भार वाहते आणि निवड ही स्वातंत्र्यही आहे, जबाबदारीही. भूतकाळ जगण्यासाठी होता. नंतरचा काळ यशासाठी होता. कदाचित आजचा काळ एकत्रीकरणासाठी आहे - महत्त्वाकांक्षा आणि मानसिक स्वास्थ्य, स्वातंत्र्य आणि नातेसंबंध, व्यक्तिमत्त्व आणि समुदाय यांचा समतोल साधण्यासाठी. भारतीय स्त्री आता केवळ काय सहन करते किंवा काय साध्य करते याने ओळखली जात नाही-ती किती सजगपणे जगते याने ओळखली जाते आणि कदाचित हाच तिच्या भावनिक उत्क्रांतीचा सर्वात क्रांतिकारक टप्पा आहे.

(प्राध्यापक व विभाग प्रमुख, मनोविकृती शास्त्र विभाग, बी वाय एल नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल)

Comments
Add Comment