Saturday, March 7, 2026

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाणीसाठा मुबलक असला तरी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या असून काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नगरसेवकांची रडारड सुरु झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी मुंबईतील विविध भागांमध्ये भेडसावत असलेल्या पाणी समस्येचा पाढा वाचला. त्यामुळे मुंबईतील विविध भागांमध्ये असलेल्या अपुरा पाणी पुरवठा आणि वितरणांमधील त्रुटींसंदर्भातील ही बाब गंभीर असल्याने याबाबत जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यासोबत स्थायी समितीच्या विशेष समितीचे आयोजन करण्यात येईल असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नगरसेवकांना आश्वासित केले.

बोरीवली आणि दहिसर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी या जलाशयातून दहिसर आणि बोरीवलीच्या भागाला पाणी पुरवठा होत असल्याने याचे काम किती वर्षांत पूर्ण होईल अशाप्रकारची विचारणा केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सन २०२२ पूर्वी शीव भागात मुंंबई दोन अंतर्गत होणाऱ्या जलवाहिनीतून १८ पौंडच्या दाबाने पाणी पुरवठा व्हायचा, जो आता केवळ १३ ते १४ पौंडने होत आहे. तर शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी आपल्या प्रभागातील भारत नगर टेकडीवर पाणी पोहोचत नसल्याने तसेच टँकरने पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांना खाली उतरुन डोक्यावरुन पाणी न्यावे लागत आहे. तर उबाठाच्या दिपमाला बढे यांनी भांडुपमध्ये जलशुध्दीकरण प्रक्रिया केंद्र आहे, पण भांडुपकरांनाच पाणी पुरवठा योग्यप्रकारे होत नाही, आजही डोंगराळ भागात पाणी येत नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी चार वर्षे नगरसेवक नसल्यामुळे वितरण व्यवस्थाच बिघडून टाकल्याचे सांगितले. त्यामुळे बिघडलेली वितरण व्यवस्थाच सुधारली गेली पाहिजे.

मनसेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी दादर हे मुंबईचे ह्दय असून या भागात प्रचारादरम्यान मतदारांनी मला घरी नेऊन पाणी किती कमी दाबाने येते हे दाखवले. जर दादरसारख्या भागात एवढ्या कमी दाबाने पाणी पुरवठा होत असेल तर ही दुर्देवी बाब असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या अश्रफ आझमी यांनी आपल्या प्रभागात कधीही पाण्याची समस्या निर्माण झाली नव्हती, पण चार वर्षांत झाल्याचे सांगितले. तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी एम पूर्व भागातील झोपडपट्टी भागात दुषित पाण्याचा पुरवठा होत असूनच हेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत अजंता यादव, तुलिफ मिरांडा, यामिनी जाधव, श्रध्दा जाधव, टी जगदीश आदींनी भाग घेतला.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भीषण असून मुंबईला ४२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे, पण प्रत्यक्षात ६०० ते ८०० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. तलावामध्ये मुबलक पाणी असतानाही जर मुंबईकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असेल तर ही वितरणातील त्रुटी आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर घ्यावीच,पण त्याबरोबरच इमारतींमध्ये ज्या रेन वॉटर हार्वेस्टींगच्या योजना राबवल्या गेल्या, त्या आता कार्यान्वित आहेत का याचीही माहिती जलअभियंता विभागाने घ्यायला हवी. गारगाई प्रकल्पालाही गती देण्याची आहे, यासाठी राज्य सरकारचीही मदतही घेऊ असे सांगत प्रभाकर शिंदे यांनी यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment