Saturday, March 7, 2026

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार

मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २.० राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. त्याशिवाय राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यासह प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंधुरत्न समृद्ध योजना ही गेली तीन वर्षे सुरू होती. ती आणखी ३ वर्षासाठी राबविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील साकव बांधणी, दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहोत, असेही ते म्हणाले. त्याशिवाय इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती केली जाईल. राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जाणार असून, यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय, तसेच सेवा आयुक्तालय असे दोन नवे आयुक्तालय निर्माण केले जाणार आहे. रत्ने आणि आभूषणे धोरणातून १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. बांबू विकास प्रकल्पांतर्गत ५० हजार कोटींची गुंतवणूक करून ५ लाख रोजगार निर्मिती करणार आहोत. औष्णिक विद्युत प्रकल्पात ५ ते ७ टक्के बांबू बायोमासच्या वापराचे उद्दिष्ट आहे. जीआयएस, एमआयएस, ब्लॉकचेन, ड्रोन इत्यादीतून बांबू मूल्यसाखळीचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र

गडचिरोली स्टिल हब उभारताना, २ कोटी ६१ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या माध्यमातून ७० हजार ८९५ रोजगार निर्मिती होणार आहे. त्याशिवाय जैवविविधता संवर्धनासाठी ५ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

- तसेच मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन ४०० जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment