मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि यशासाठी प्रार्थना केली.
ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी पारंपारिक पूजा विधी केले. मंदिरात भाविकांच्या गर्दीत, क्रिकेपटूंनी गणपतीचे दर्शन घेतले आणि संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. हे तिघेही सध्या भारतीय संघातील महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत.
या विश्वचषकात सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा केल्या, त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावा केल्या. नॉकआउट सामन्यांमध्ये या सलामीवीर फलंदाजाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
View this post on Instagram
दुसरीकडे, ईशान किशनने नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले, त्यानंतर सुपर ८ सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध ३८ धावांची खेळी केली. आगामी सामन्यात देशाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अक्षर पटेलने या विश्वचषकात अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एक विकेट घेतली. त्याच्याकडून चाहत्यांना केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही खूप अपेक्षा आहेत.
टीम इंडियाने अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग चार ग्रुप स्टेज सामने जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर, भारताने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव केला. त्यानंतर, निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.







