अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील हुपरीमधील २३ पर्यटक अडकले होते. मात्र, आता हा प्रवासी ग्रुप सुरक्षितपणे मायदेशी परतला आहे.
करवीर निवासिनी आई अंबाबाईची कृपा :
युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईसह आखाती देशांतील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कोल्हापूरकरांनी “करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळेच आम्ही सुरक्षित परतलो. भारत सरकारने दुबईसह अडकलेल्या सर्वांना परत आणावे,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
यूएईकडून पर्यटकांना ‘सॉरी गिफ्ट’ :
यूएई प्रशासनाने परतीच्या मार्गावर अडकलेल्या पर्यटकांसाठी दिलगिरी व्यक्त करत ग्रुपमधील प्रत्येकाला २६ हजार रुपयांचे ‘सॉरी गिफ्ट’ दिले आहे. इराणने युद्धजन्य परिस्थितीमुळे आपली हवाई वाहतूक बंद केल्याचे जाहीर केले, ज्याचा परिणाम दुबई, अबुधाबी आणि शारजाह विमानतळांवर झाला.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, “आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळाली आहे आणि ते सुरक्षित आहेत.” दुबईत महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश असलेला हा २३ जणांचा पर्यटन ग्रुप अचानक आलेल्या सुरक्षा अलर्ट आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे घाबरला होता.
परत आलेल्या नागरिकांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितले की, “आकाशात उठणाऱ्या धुराच्या लोटांमुळे जीवाची घालमेल वाढत होती. मात्र, प्रशासनाच्या मदतीमुळे सुरक्षित परतलो,” असे प्रतिक्रीया दिली.
यूएईच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने अडकलेल्या २० हजार प्रवाशांसाठी हॉटेल, जेवण, पाणी आणि बुकिंगचा सर्व खर्च उचलला. दुबई प्रशासनाने परतणाऱ्या प्रत्येक कोल्हापूरकराला २६ हजार रुपये दिले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने विमान कंपन्यांना आखाती देशांच्या हवाई मार्गांपासून बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत.







