परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर
मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. अबू धाबीतील भारतीय दूतावास आणि दुबईतील 'काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया'चे प्रतिनिधी सातत्याने तिथल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. "भारतीय नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे," असा विश्वास दूतावासाने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट संपर्कात; मदतीसाठी यंत्रणा कार्यान्वित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, ते दुबईतील 'इंडियन पीपल्स फोरम' या संस्थेच्या सतत संपर्कात आहेत. तेथील मराठी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष समन्वय साधला जात आहे. महाराष्ट्रातील जे नागरिक सध्या दुबई किंवा अबू धाबीत अडकले आहेत किंवा तिथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने एक अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक देखील जारी केला आहे. या सुविधेमुळे नागरिकांना तातडीची माहिती आणि साहाय्य मिळणे सोपे होणार आहे.
महत्त्वाची सूचना आणि संपर्क माहिती
यूएईमधील मराठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी अबू धाबीतील भारतीय दूतावास (@IndembAbuDhabi) आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया (@cgidubai) यांच्या 'X' (ट्विटर) खात्यांना फॉलो करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मदतीसाठी खालील क्रमांकाचा वापर करावा. अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक : +971 50 365 4357