मुंबई : महाविकास आघाडीतील भांडणे ज्यांना सोडवता येत नाहीत, राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षातील कुरघोड्या ज्यांना रोखता येत नाहीत त्या उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसा समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा या बाबत शहाजोग सल्ला देणे हास्यास्पद आहे, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी संजय राऊतांचा समाचार घेतला. इराण-अमेरिका युद्धावर बोलण्याऐवजी संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीत उबाठा ची आणि मविआ ची मते फुटणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत सजग असून योग्य तो निर्णय घेत असल्याने देशातील १४० कोटी जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. संवेदनशील युद्धजन्य परिस्थितीत भारतीयांचे हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता पंतप्रधानांकडे आहे. त्यामुळे राऊत यांनी त्यांना सल्ले देण्याऐवजी महाविकास आघाडीतील सावळा गोंधळ निस्तरावा.
व्हीएसआर कंपनीबाबत जय पवार यांनी केलेले ट्विट अत्यंत गंभीर असून कंपनीकडून हलगर्जी झाली असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे बन यांनी नमूद केले.
मविआ मध्ये तिन तिघाडा काम बिघाडा
शरद पवार रुग्णालयात असताना त्यांना भेट देण्याचे सौजन्यही उद्धव ठाकरेंच्या अंगी नाही अशी टीका बन यांनी केली. राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षांतील रस्सीखेच यातून दिसून येते. राऊतांचा शरद पवारांना पाठिंबा आहे तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मात्र पवारांच्या बाजूने नाहीत. राऊत हे खाल्ल्या मीठाला जागणारे नाहीत, उबाठाचे मीठ खातात मात्र बाजू शरद पवारांची घेतात असा घणाघातही बन यांनी केला.







