Thursday, March 26, 2026

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश

मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दोन महिन्यांत सव्वा कोटी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला असून, ३१ मार्च २०२६ पर्यंतची निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सध्या राज्यभरात आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यन्वित करण्यात आली आहे.

राज्यात १५ जानेवारीपासून राबवण्यात आलेल्या 'अरुणोदय' अभियानांतर्गत शून्य ते ४० वयोगटातील ७३ लाख ४५ हजार व्यक्तींची नोंदणी करण्यात आली. यातील ५३ लाख ४७ हजार जणांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाली असून, १ हजार ६४५ नवीन रुग्ण आणि २७ हजार ११२ वाहक शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या मोहिमेमुळे सिकलसेल प्रतिबंधासाठी मोठी मदत होणार आहे.

'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य' कार्यक्रमांतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ३८१ चिमुकल्यांवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. याशिवाय हर्निया, क्लेफ्ट लिप यांसारख्या गंभीर व्याधींवरील २२ हजार ५३९ शस्त्रक्रिया करून बालकांना नवजीवन देण्यात आले आहे.

आरोग्य मोहिमांचे अंकगणित

१) असंर्गजन्य रोग - २५ लाख जणांची रक्तदाब तपासणी; १० लाख जणांवर उपचार सुरू.

२) मधुमेह तपासणी - १२.५२ लाख तपासण्या; २.८८ लाख रुग्णांचे निदान.

३) हत्तीरोग निर्मूलन - ६०१ रुग्णांवर शस्त्रक्रिया

४) क्षयरोग - १.१२ लाख रुग्णांना 'फूड बास्केट'चे वितरण

५) गर्भवती माता - ४ हजार ५८० तीव्र रक्तक्षय असलेल्या मातांना आयर्न सुक्रोज उपचार.

गडचिरोली 'मलेरिया मुक्त' होणार

  • दुर्गम भागातील आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी ८४ हजार ७३२ विशेष कीटकनाशकयुक्त मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, आयसीएमआरच्या सहकार्याने या भागात सहा संशोधन प्रकल्पही राबविले जात आहेत.
  • कुष्ठरुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३.६७ लाख जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहेत. सोबतच मौखिक, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
  • राज्यातील ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तिथे तातडीने मनुष्यबळ आणि सामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा शासनाचा ठाम निर्धार आहे. नागरिकांनी या सर्व मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा