Wednesday, August 26, 2026

उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार

मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि 'शत्रुत्व' यापेक्षा 'संधी'ला किती महत्त्व असते, याचा प्रत्यय जळगावच्या राजकारणाने पुन्हा एकदा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील 'उबाठा' गटाचा प्रमुख चेहरा आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' ठोकण्याचा निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. येत्या शुक्रवारी (६ मार्च) मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार असून, जळगावच्या राजकारणात 'गुलाबराव-उन्मेष' ही नवी युती काय चमत्कार घडवते, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

२०१९ मध्ये भाजपकडून ४ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने खासदार झालेल्या उन्मेष पाटलांचा राजकीय प्रवास गेल्या दोन वर्षांत मोठ्या वळणांवरून गेला आहे. २०२४ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी तडकाफडकी 'मातोश्री'वर धाव घेत हाती मशाल घेतली होती. मात्र, त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा सत्तेच्या प्रवाहात सामील होणे पसंत केले आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या 'घरवापसी'वर शिक्कामोर्तब झाले.

गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय होती. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि विकासाचा वेग हीच आपल्या पक्षप्रवेशाची प्रेरणा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >