श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे अफगाणिस्तान विरोधाच्या युद्धात पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. असं असतानाही पाकिस्तान भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन पाठवण्याची हिंमत करत आहे. या घटना सातत्याने समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा पार करुन एक पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत होता. पण भारतीस सैन्याच्या निदर्शनास येताच सैन्याने त्या ड्रोनच्या दिशेला गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे ते ड्रोन परत पाकिस्तानच्या दिशेला पळून गेले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. ड्रोन दिगवार परिसरात काही क्षण घिरट्या मारत होते. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेला परतले.
सीमेवर तैनात असलेल्या एका सैनिकाने रविवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटाच्या सुमारास पाकिस्तानचे ड्रोन पाहिले. त्यानंतर ते पाडण्यासाठी त्याच्या दिशेला गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनने पहाटे पावणे सहा ते सहा वाजेच्या सुमारास भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या ड्रोनवर गोळीबार केल्यानंतर ड्रोन तातडीने पाकिस्तानच्या दिशेला परत गेले.
या ड्रोनच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन केलं जात आहे. ड्रोनमधून कुठलं शस्त्र किंवा काही अंमली पदार्थ एअरड्रॉप तर केले गेले नाहीत ना, याबाबत शोध घेतला जात आहे. याआधी २७ फेब्रुवारीला देखील भारतीय लष्कराच्या जवानाने भारताच्या हवाई हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी ड्रोनच्या दिशेला गोळीबार केला होता.
महिन्याभरापूर्वीदेखील अशीच घटना घडली
विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशाच प्रकारे पाकिस्तानी ड्रोन घिरट्या मारताना दिसले होते. सुरक्षा एजन्सीजने देखील ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच ड्रोन दिसल्यानंतर BSF च्या जवानांनी त्या ड्रोनवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर तातडीने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसेच सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले होते.
विशेष म्हणजे अशाप्रकारे पाकिस्तानच्या ड्रोनच्या घुसखोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीदेखील कठुआ जिल्ह्यात ड्रोन घिरट्या मारताना दिसल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यादिवशी तब्बल पाच मिनिटांपर्यंत ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत बघायला मिळालं होतं. त्यामुळे सुरक्षा दल तातडीने अलर्ट झाले होते. पण तरीही सीमाभागात सातत्याने पाकिस्तानच्या कुरापती बघायला मिळत आहेत.







