नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अयातुल्ला अली खामेनी हे शिया मुसलमानांचे धर्मगुरु होते. जगातील अनेक देशांतले आणि प्रामुख्याने भारतातले शिया मुसलमान त्यांचा धर्मगुरु म्हणून आदर करत होते. या पार्श्वभूमीवर अमेरिका - इस्रायलच्या हवाई हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर भारतासह अनेक देशांमध्ये ठिकठिकाणी शिया मुसलमानांच्यावतीने अमेरिका आणि इस्रायल यांचा निषेध करण्यासाठी आंदोलनं करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत हाय अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो यामुळे देशांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अलर्ट दिला आहे. इराण समर्थक आणि इराण विरोधी गटांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि इराणी, अमेरिकन आणि इस्रायली दूतावास आणि वाणिज्य दूतावासांभोवती सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने शिया मिलिशिया तसेच इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून असे दिसून येते की दहशतवादी गट अशांतता निर्माण करण्यासाठी या तणावपूर्ण वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दूतावास, प्रमुख पर्यटन स्थळे, ज्यू संस्था आणि पाश्चात्य-संलग्न आस्थापनांना संभाव्य लक्ष्य म्हणून सूचीबद्ध केले आहे. केंद्र सरकारने राज्यांना मोक्याच्या आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या तसेच संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यास सांगितले आहे. तसेच संशयास्पद ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.







