मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ' लेटर ऑफ इन्टेंट' देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय 'एज्युसिटी' मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी.
Maharashtra-Canada: Powering the Next Chapter of Global Partnership 🔸CM Devendra Fadnavis welcomed the Canadian delegation at the 'Maharashtra-Canada: Building the next phase of Investment & Innovation'. CM Fadnavis emphasised Maharashtra’s major achievements in… pic.twitter.com/LCasqA8vE6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 1, 2026
कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले.







