तेहरान : अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर (Iran) हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेमध्ये युद्ध भडकले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत.
जगावर हे दहा परिणाम होतील ?
1) तेल आणि गॅसच्या किमती वाढतील या युद्धामुळे जगभरात तात्पुरते ऊर्जा संकट निर्माण होईल. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढू शकतात. 2) महागाईचा धोका इंधनाच्या किमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम वाहतूक, अन्न आणि औषधांवर होईल. 3) मध्य पूर्वेतील संकट हे युद्ध आणखी भडकले तर त्याचा परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेवर होईल. इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्यांना आठ देशांवर हल्ला केलाय. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती बिघडली आहे. अमेरिका, इस्रायल हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणचे मित्र राष्ट्र हिजबुल्लाह आणि हुथी सक्रिय होऊ शकतात. यामुळे युद्ध इस्रायल, लेबनॉन आणि येमेनमध्ये पसरू शकते. 4) अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेल इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने अनेक देशांमध्ये आपले लष्करी तळ निर्माण केले आहेत. त्या ठिकाणी हवाई, नौदल व सैनिक तैनात केले आहेत. सुमारे चाळीस हजार सैनिक या तळांवर आहेत. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेल. 5) इराण अण्वस्त्र निर्मिती मोहीम तीव्र करेल अमेरिकेने इराणला अण्वस्त्रे विकसित करू नयेत असे सातत्याने आवाहन केले होते. त्यावरूनच इराणवर हल्ला झाला आहे. त्यामुळे भविष्यातील शस्त्र सज्जता म्हणून इराण अण्वस्त्र विकसित करू शकतात. 6) रशिया, चीन आणि भारताची भूमिका काय? अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. त्यात मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांचा अमेरिकेला मूक पाठिंबा आहे. पण मध्य-पूर्वे संघर्षात चीन, रशिया, भारत यांची ठोस भूमिका नाही. या तिन्ही देशांची भूमिका भविष्यात महत्त्वाची असणार आहे. 7) इंधनाचे दर भडकणार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चा तेलाची आयात होते. हा मार्ग बंद पडला तर जगातील तेलाच्या व्यापाऱ्यावर वीस ते टक्के परिणाम होऊ शकते. एकटा भारत या मार्गातून तीस ते चाळीस टक्के तेल आयात करतो. 8) जगभरातील बाजार कोसळतील या युद्धाचा थेट परिमाण महागाईवर होईल. या भू राजकीय संघर्षाचा परिणाम जगाच्या बाजारावर होईल. तेल आणि ऊर्जा-संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतातत. ज्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होते. 9) निर्वासितांचे मोठे संकट युद्धाचा आणखी भडका उडू शकतो. त्यातून इराण आणि शेजारील देशांमधून लाखो लोक युरोप आणि आशियातील इतर देशात स्थलांतर करतील. त्यामुळे अनेक देशांमध्ये निर्वासितांचे संकट निर्माण होऊ शकते. 10) संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव (UN) किती दिसला ? या युद्धाने संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. कारण अमेरिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलंय. या युद्धाने संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी झाला आहे.
इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसणार ?
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहेत. त्याचा परिणाम जगावर होणार आहे. भारताला मोठा फटका बसू शकतो.
भारताचा इराणबरोबर व्यापार कसा होतो ?
इराणसोबत भारताचा व्यापार १.६८ अब्ज डॉलरचा बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधे, औद्योगिक यंत्रसामग्रीची निर्यात सफरचंद, पिस्ता, खजूर, खनिजे, खते, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू, धातूंची आयात
भारताचा इराणबरोबर व्यापार कमी का झाला ?
भारत २०१९ पर्यंत इराणसोबत १७.०३ अब्ज डॉलरचा व्यापार करत होता आता केवळ १.६८ अब्ज डॉलरचा व्यापार अमेरिकेने कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घातल्याने व्यापार घटला
"तुमचं युद्ध आमच्याशी नाही, शहाणपणाने वागा, नाहीतर..."; इराणच्या हल्ल्यानंतर यूएईचा संतप्त इशारा
पश्चिम आशियातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर पेटलेल्या वणव्यात इराणने आता थेट संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केले आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दुबई आणि अबू धाबीसह अनेक आखाती देश हादरले असून जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुर्ज अल अरब आणि विमानतळाला लक्ष्य
शनिवारी मध्यरात्री इराणने दुबईवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात दुबईची शान मानले जाणारे आणि जगातील ७-स्टार हॉटेल बुर्ज अल अरबचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, जगातील सर्वात व्यस्त असणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाच मोठे स्फोट झाले असून इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे विमानतळ तातडीने बंद करण्यात आले असून संपूर्ण आखाती क्षेत्रातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अबू धाबीतील अमेरिकन तळावर हल्ला
इराणच्या क्षेपणास्त्रांनी केवळ दुबईच नव्हे, तर अबू धाबीमधील अमेरिकेच्या अल-धफ्रा या लष्करी तळालाही लक्ष्य केले. या तळावर झालेल्या थेट हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले. याव्यतिरिक्त, पाम जुमेराह या बेटावरील एका हॉटेलजवळही भीषण आग लागल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले. फक्त यूएईच नाही, तर कतारची राजधानी दोहा आणि ओमानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
इराणने स्वतःलाच एकाकी पाडले; यूएईचे चोख प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी इराणवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांचे राजनैतिक सल्लागार अन्वर गरगाश यांनी इराणला खडे बोल सुनावले. "इराणने केलेला हा हल्ला म्हणजे त्यांची खूप मोठी चूक आहे. तुमचं युद्ध तुमच्या शेजारी देशांशी (आमच्याशी) नाही, मग आम्हाला का लक्ष्य करत आहात? इराणने आता तरी शहाणपणाने वागावं, नाहीतर संपूर्ण जग त्यांच्याकडे पाठ फिरवेल आणि ते जगात एकटे पडतील," असं अन्वर गरगाश म्हणाले.
खाडी देशांत युद्धाचा वणवा! दुबई, दोहानंतर ओमानवरही हल्ले; भारताला कसा बसणार फटका?
पश्चिम आशियातील परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून, युद्धाची व्याप्ती वाढली आहे. इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता प्रत्युत्तरादाखल दुबई, दोहा आणि पहिल्यांदाच ओमानवरही क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता बळावली असून, यामुळे संपूर्ण जगावर जागतिक आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे.
इराणमध्ये सत्तांतराची नांदी की विनाशाची सुरुवात?
खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे भवितव्य अंधारात आहे. राजकीय तज्ज्ञ यांच्या मते, अमेरिका आणि इस्राईलने इराणमधील सत्ता उलथवून लावण्याचे 'मॅक्सिमम टार्गेट' ठेवले आहे. मात्र, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी सावध केले आहे की, हा केवळ अणुऊर्जेचा वाद नसून मध्यपूर्वेत इस्राईलचा प्रभाव वाढवण्याचा मोठा डाव असू शकतो. बाह्य हल्ल्यांमुळे इराणची जनता आपल्या शासनाच्या मागे एकवटू शकते, ज्यामुळे सत्तापालट करणे कठीण होईल. इराणने गेल्या अनेक वर्षांच्या तेल उत्पन्नातून आपली क्षेपणास्त्र आणि ड्रोन शक्ती कमालीची वाढवली आहे.
'होर्मुझ'ची नाकेबंदी आणि भारताची चिंता
या युद्धाचा सर्वात मोठा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. जर 'होर्मुझ' सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला, तर जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून यावे लागेल. यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ प्रचंड वाढेल. भारत आपल्या गरजेच्या ८५% तेल आयात करतो. जरी भारताने इराणकडून तेल खरेदी कमी केली असली, तरी जागतिक बाजारात वाढणाऱ्या किमतींमुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेल महाग होऊन महागाईचा भडका उडू शकतो. सध्याच्या संकटात अंदमान किनारपट्टीवरील गॅस शोध प्रकल्पांना गती देणे भारतासाठी अनिवार्य ठरले आहे.
जागतिक बाजारपेठांची 'वेट अँड वॉच' भूमिका
सध्या जागतिक शेअर बाजारांनी या तणावावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत १०-१५ टक्क्यांची वाढ झाल्यास अमेरिकन आणि युरोपीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्या घाईघाईने निर्णय घेऊ नये, कारण भू-राजकीय घडामोडींमुळे बाजार अनपेक्षित वळण घेऊ शकतो.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर शिया समुदाय रस्त्यावर:इराणमध्ये 'डेथ टू अमेरिका' च्या घोषणा
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या रस्त्यांवर लोक शोक करताना दिसले. लोकांनी ‘डेथ टू अमेरिका’ आणि 'डेथ टू इस्रायल'च्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तरादाखल कारवाईची मागणी केली. भारतातही शिया समुदायाचे लोक खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. श्रीनगर, लेह, लखनऊ येथून निदर्शनांची छायाचित्रे समोर आली. मात्र, अमेरिका आणि इराणच्या काही भागांमध्ये लोकांनी या बातमीवर आनंदोत्सवही साजरा केला.







