मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या क्षणाची चाकरमानी आतुरतेने वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण अखेर उजाडला आहे. मुंबई ते विजयदुर्ग या जलवाहतूक सेवेचा आज, १ मार्च रोजी 'श्रीगणेशा' होत असून, यामुळे कोकणच्या दळणवळण क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला जात आहे.
एकेकाळी मुंबई आणि कोकणाला जोडणारी जलवाहतूक एका दुर्दैवी अपघातानंतर खंडीत झाली होती. मात्र, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्न पुन्हा सत्यात उतरले आहे. आज सकाळी मुंबईतील ऐतिहासिक भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'रोरो' रवाना होईल. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना हा प्रकल्प कोकणच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
७ तासांत विजयदुर्ग गाठणे शक्य
रस्ते वाहतुकीतील समस्या आणि रेल्वे आरक्षणाची अडचण लक्षात घेता, ही जलवाहतूक सेवा कोकणवासीयांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या सेवेसाठी 'एम२एम प्रिन्सेस' हे आधुनिक जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने नेण्याची त्याची क्षमता आहे. या जहाजामुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्गला पोहोचता येईल. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळापत्रक आणि नियोजन
- मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता.
- विजयदुर्गहून प्रस्थान : दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता.
तिकीट दर असे
- इकॉनॉमी - ३,०००
- प्रीमियम इकॉनॉमी - ५,०००
- बिझनेस - ७,०००
- फर्स्ट क्लास - ९,०००
वाहनांसाठी शुल्क (कार)
एक्सएल (अतिरिक्त मोठी) - ९,०००
एल (मोठी) - ८,०००
एम (मध्यम) - ७,०००
एस (लहन) - ६,०००
दुचाकी - १,०००
सायकल - ६००
बुकींग कुठे कराल?
www.m2mferries.com, https://www.m2mferries.com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.







