Sunday, March 1, 2026

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकाने मल्टी-मॉडेल भूमिगत बोगद्यांचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईत बहुस्तरीय बोगद्यांची उभारणी करण्यात येणार असून त्यात रस्ते वाहतूक आणि जलवाहिनी,मलवाहिनींची सेवा तसेच सुविधा सुविधांचे जाळे असे एकत्रित सेवा सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्प सल्लागाराच्या अहवालानंतर पुढील साडेपाच वर्षांमध्ये अशाप्रकारच्या बहुस्तरीय बोगद्यांची उभारणी केली जाणार आहे.

महापालिकेच्या या बहुस्तरीत बोगदा प्रकल्पाची माहिती महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दिली आहे. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार. बहुस्तरीय बोगदा प्रकल्पाच्या आराखड्यानुसार एका स्तरावर वाहनांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगदा असेल तर दुसऱ्या स्तरावर पर्जन्य जलवाहिनी, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी, मलनिःसारण आणि इतर उपयुक्तता सेवा सुविधांचे जाळे अशाप्रकारे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या दुहेरी रचनेमुळे शहरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार येईल, तसेच पूरप्रतिबंधक उपाययोजना अधिक सक्षम बनेल अशाप्रकारचा विश्वास प्रशासनाच्यावतीने व्यक्त केला जात आहे.

या प्रकल्प कामांसाठी सुमारे ६ किलोमीटरसाठी सुमारे ४३९२ कोटी रुपये एवढा खर्च असून प्रति किलोमीटरसाठी सुमारे ७३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वासाठी ६६ महिन्यांचा कंत्राट कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी, बृहत आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार करणे, निविदा प्रक्रिया व्यवस्थापन तसेच यासाठीच्या बांधकामाची देखभाल आदी सर्व कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी संबंधित सल्लागारास कार्यादेश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनसंख्येचा विचार करता हा प्रकल्प शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. मात्र, प्रकल्प साकार करण्यास लागणारा जास्त कालावधी आणि त्यासाठी जास्त निधी खर्च होणार असल्याने याची खरोखरच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >