जंगलांच्या सहनशक्तीची कसोटी

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे


हवामान बदल हा केवळ तापमानवाढीचा प्रश्न नाही, तर ती परिसंस्थांच्या सहनशक्तीची कसोटी आहे. जंगलांसाठी हा निर्णायक टप्पा आहे. प्रश्न असा आहे, की जंगलांमध्ये आधीपासून असलेले घटक, प्रजातींची विविधता आणि जैविक रचना या सर्वांचा एकत्रित परिणाम हवामान बदलाच्या वास्तवाला तोंड देण्यासाठी पुरेसा ठरेल का? याबाबत मानवाची भूमिका काय असायला हवी?


‌‘ग्लोबल चेंज बायॉलॉजी‌’मध्ये अलीकडे एक संशोधन प्रसिद्ध झाले. हवामान बदलाच्या झपाट्याने बदलणाऱ्या वास्तवाला सामोरे जाण्यास जंगलातील गुणधर्म, प्रजातींची विविधता, जैविक रचना पुरेशी आहे का, या प्रश्नाचा सखोल अभ्यास हे संशोधन करते. ‌‘युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया‌’, ‌‘सांता बार्बारा‌’ आणि ‌‘युनिर्व्हसिटी ऑफ उताह‌’मधील संशोधकांनी वन परिसंस्थेतील जैविक गुणधर्म, पानांची रचना, झायलमचे कार्य, जलवाहिन्यांची क्षमता आणि प्रजातींची रचना यांचा अभ्यास केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जंगलांची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केलेल्या अभ्यासातून दिसून आले, की बहुसंख्य जंगलांमध्ये उष्ण आणि कोरड्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता काही प्रमाणात आहे. झाडे त्यांच्या पानांच्या आकारात, घनतेत आणि रंध्रांच्या कार्यात बदल करू शकतात. वाढलेल्या कार्बन डायऑक्साइडच्या पार्श्वभूमीवर काही झाडे कमी पाणी गमावत प्रकाश संश्लेषण करू शकतात. परिसंस्थेत आधीपासून अस्तित्वात असलेल्या दुष्काळ-सहनशील प्रजाती अधिक प्रभावी होऊ शकतात. अमेरिकेतील जवळपास ८८ टक्के जंगलांमध्ये अशा प्रकारची रचनात्मक आणि प्रजाती-आधारित विविधता आढळते. ती पोषक आहे. याचा अर्थ असा, की निसर्ग पूर्णपणे असहाय नाही. जितकी विविधता अधिक, तितकी बदल सहन करण्याची शक्यता जास्त; पण येथेच सर्वात मोठी चिंता उभी राहते. जंगले बदलत आहेत; पण हवामान ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाशी जंगलांची जैविक प्रतिक्रिया जुळत नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो आहे. त्याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.


उत्क्रांती हा दीर्घकालीन आणि संथ प्रक्रियेचा भाग आहे. शेकडो वर्षे जगणाऱ्या वृक्षांसाठी पुढील काही दशकांमध्ये होणारे हवामान बदल अत्यंत वेगवान असणार आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा ताण झाडांच्या मृत्यूदरात वाढ करू शकतो. काही प्रजाती नष्ट होऊ शकतात आणि त्या जागी अधिक कठीण, कोरड्या हवामानाशी सुसंगत प्रजाती येऊ शकतात. आज वने मानवनिर्मित कार्बन उत्सर्जनापैकी सुमारे ३० टक्के कार्बन शोषून घेतात. जंगलांची संरचना बदलली आणि त्यांची वाढ आणि स्थैर्य कमी झाले, तर ही क्षमता घटू शकते. म्हणजेच, हवामान बदलामुळे जंगलांची कार्बन शोषणक्षमता कमी होईल आणि त्यामुळे हवामान बदल आणखी वेगाने वाढेल. हे एक दुष्टचक्र आहे. दुसरीकडे, ‌‘युनिर्व्हसिटी ऑफ क्वीन्सलँड‌’च्या संशोधनानुसार उष्ण कटिबंधीय वर्षावनांपैकी सुमारे २५ टक्केच उच्च-गुणवत्तेची, घनदाट आणि कमी मानवी हस्तक्षेप असलेली वने उरली आहेत. हा निष्कर्ष ‌‘प्रोसेडिंग ऑफ दि नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स‌’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. म्हणजेच, केवळ जंगलांचे क्षेत्र टिकून आहे म्हणून समाधान मानता येणार नाही. त्यांची रचनात्मक गुणवत्ता आणि अखंडता अधिक महत्त्वाची आहे. संकटग्रस्त प्रजातींसाठी आवश्यक असलेले घनदाट अधिवास झपाट्याने कमी होत आहेत. जंगलांमध्ये काही प्रमाणात स्वाभाविक अनुकूलनशक्ती आहे, हे नाकारता येत नाही; पण ती पुरेशी ठरेल का? उत्तर सरळ ‌‘हो‌’ किंवा ‌‘नाही‌’ असे नाही.


मानवनिर्मित दबाव, जंगलतोड, अधिवास विखंडन, प्रदूषण यात कपात झाली आणि हवामान बदलावर तातडीने नियंत्रण ठेवले गेले, तर जंगलांची अंतर्गत जैविक शक्ती त्यांना वाचवू शकते; पण सध्याची गती कायम राहिल्यास जंगलांची अनुकूलन क्षमता अपुरी पडू शकते, म्हणूनच धोरणात्मक पातळीवर काही मूलभूत बदल आवश्यक आहेत. दुष्काळ सहन करू शकणाऱ्या स्थानिक प्रजातींना प्राधान्य देणारी लागवड अधिवासांची अखंडता जपणे, मानवनिर्मित व्यत्यय कमी करणे, हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय घट आदी उपाय योजायला हवेत. जंगलांमध्ये हवामान बदलाशी जुळवून घेण्याची बीजे नक्कीच आहेत; पण त्या बीजांना वाढण्यासाठी योग्य पर्यावरण, वेळ आणि संरक्षणाची आवश्यकता आहे. अन्यथा, ही क्षमता केवळ संभाव्यता राहील, प्रत्यक्ष संरक्षण नव्हे. जंगलांचे भविष्य त्यांच्या अंतर्गत गुणधर्मांवर जितके अवलंबून आहे, तितकेच आपल्या राजकीय इच्छाशक्तीवर आणि सामूहिक कृतीवर अवलंबून आहे. प्रश्न जंगलांच्या क्षमतेचा नाही; प्रश्न आपण त्या क्षमतेला साथ देतो का याचा आहे. जगभरातील जंगलांसाठी कठीण काळ येऊ घातला आहे. हवामान बदलामुळे संपूर्ण जगात तापमान वाढत आहे आणि आर्द्रतेची पातळी घटत आहे. दुष्काळाचा जंगलांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संशोधकांनी वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञांनी संकलित केलेली आकडेवारी गणितीय मॉडेलशी जोडली. अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार बहुतेक जंगलांमध्ये उष्ण आणि कोरड्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता आहे; पण या तणावापासून बचाव करण्यासाठी ते पुरेशा वेगाने बदलत नाहीत.


हवामान बदलामुळे वाढणाऱ्या पाण्याच्या कमतरतेच्या तणावापासून बचाव करण्यासाठी जंगल पुरेशा वेगाने बदलत नसल्याचे पाहून संशोधक चिंतित झाले. जगातील बहुतेक जंगलांमध्ये प्रजातींच्या संरचनेतील बदलांच्या माध्यमातून दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता आढळते. प्रत्येक झाड आपल्या क्रियाकलापांमध्ये, शरीरक्रियेमध्ये आणि जनुक अभिव्यक्तीत नव्या परिस्थितीनुसार बदल करू शकते. अमेरिकेतील वनस्थितीच्या डेटाबेसमध्ये झाडांचे स्थान, प्रजाती, आकार, घनता आणि आरोग्य तसेच त्यांची वाढ, मृत्यूदर आणि तोड यांची नोंद असलेली वन यादी समाविष्ट आहे. संशोधकांनी ‌‘झायलम फंक्शनल ट्रेट्स‌’ डेटाबेसमधील आकडेही वापरले. त्यात झाडांच्या शरीरक्रिया आणि जलवाहिनीसंबंधी गुणधर्मांचे मोजमाप संकलित केले जाते आणि हा डेटाबेस ‌‘फॉरेस्ट इन्व्हेंटरी‌’शी जोडला जातो. पाण्याच्या वाढत्या कमतरतेच्या तणावाला जंगल कसे प्रतिसाद देतात, याचे अनुकरण करणारे एक मॉडेल टीमने विकसित केले. हे मॉडेल प्रकाश संश्लेषणाबरोबरच वनस्पतीवरील तणावाचे भाकीत करते. पानांमधील बदल पर्यावरणीय परिस्थितींमधील बदलांमुळे निर्माण होणारा तणाव कसा भरून काढू शकतो हे पाहण्यासाठी त्यांनी एक अनुकूलन तंत्रही समाविष्ट केले. अभ्यासानुसार आतापर्यंतच्या सर्व आकडेवारीवरून असे दिसते, की पाण्याअभावी तणाव व्यवस्थापित करण्यासाठी प्रत्येक झाडासाठी पान हे सर्वात मोठे साधन आहे.
कोरड्या प्रदेशांमध्ये झाडांची पाने कातरदार किंवा कमी असतात, तर ओलसर प्रदेशांमध्ये झाडे दाट पाने धारण करू शकतात. संशोधकांना आढळले, की जगभरात अनेक जंगलांमध्ये अनुकूलनाची क्षमता आहे. मॉडेलनुसार अमेरिकेतील ८८ टक्के जंगलांमध्ये हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करणारे गुणधर्म आणि प्रजाती वैविध्य आहे. तथापि, बहुतेक झाडे मॉडेलने भाकीत केलेल्या वेगाने जुळवून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे नष्ट होण्याचे प्रमाण जास्त आहे. वनस्पती ज्या रंध्रांद्वारे कार्बन डायऑक्साइड घेतात, त्याच रंध्रांद्वारे पाणी गमावतात. त्यामुळे वातावरणात अधिक कार्बन डायऑक्साईड असल्यास वनस्पती या रंध्रांचा आकार कमी करूनही प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक कार्बन मिळवू शकतात. यामुळे पानांतून बाहेर जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. संशोधकांच्या मते उष्ण हवामानात वातावरण अधिक कोरडे असते. त्यामुळे पाने अधिक पाणी गमावतात. ही अनिश्चितता आणि परस्पर भरपाई करणाऱ्या घटकांनी युक्त अशी गुंतागुंतीची प्रणाली आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी सूक्ष्म मॉडेलची गरज आहे. जंगले आधीच बदलू लागली आहेत. वातावरण अधिक कोरडे होत जाईल, तशी दाट जंगले कमी होतील. जंगलांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या अस्तित्वात असलेल्या प्रजातींचे वेगळे मिश्रण आढळू शकते. हे सर्व घटक वन कार्बन साठ्यावरही परिणाम करतात. एका नव्या संशोधनानुसार जगभरातील उष्णकटिबंधीय वर्षावनांपैकी एक चतुर्थांशाहूनही कमी जंगलांमध्ये हजारो संकटग्रस्त प्रजाती विलुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.


संशोधनानुसार ‌‘रिमोट सेन्सिंग‌’ तंत्राचा वापर करून जंगलांवर अवलंबून असलेल्या कशेरुकी प्रजातींच्या वितरण क्षेत्रांमध्ये वर्षावनांची गुणवत्ता विश्लेषित करण्यात आली. ९० टक्क्यांपर्यंत जंगल या प्रजातींच्या क्षेत्रात अद्याप अस्तित्वात आहे; पण त्यापैकी केवळ २५ टक्के भागच उच्च गुणवत्तेचा आहे. तो विलुप्त होण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहे. घनदाट वर्षावने जैवविविधतेसाठी अत्यावश्यक आहेत; पण ही महत्त्वाची जंगले किती प्रमाणात कमी झाली आहेत, हे पूर्वी स्पष्ट झाले नव्हते. क्वीन्सलँडच्या ओलसर उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणाऱ्या ‌‘गोल्डन बोवरबर्ड‌’ची घटती संख्या म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. त्याच्या ८४ टक्के अधिवास शिल्लक असला, तरी त्यापैकी फक्त ३६ टक्के भाग घनदाट वर्षावनाचा आहे. जैवविविधतेसाठी मानवनिर्मित व्यत्यय कमी करणे तितकेच आवश्यक आहे. एकंदरीत, पुढील हानी टाळण्यासाठी सर्वाधिक घनदाट वर्षावनांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.

Comments
Add Comment

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते

वेळेचे महत्त्व

जीवनगंध : पूनम राणे शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र,

कोकणचा शिमगा... काळजातली ओढ

संस्कृती : विभा मसुरकर  कोंकणात होळीला शिमगा म्हणतात. फाल्गुन पंचमीपासून अनेक ठिकाणी या उत्सवाला सुरुवात

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की,

एकादशीचे व्रत भद्रशील उपाख्यान

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले

‘हजार राहे मूडके देखी...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे एक काळ होता जेंव्हा सिनेमा भारतीय समाजमनाचा आरसा होता. त्यात सगळेच होते, भारतीय