Sunday, March 1, 2026

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित वेळेनुसार आज भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश असून २३ जणांपैकी १२ जण ज्येष्ठ नागरिक आहेत. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपल्याची माहिती समोर येत आहे. हॉटेल खर्च आणि इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण झाल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

हे सर्व नागरिक सध्या दुबईतील ए-१ फहादी स्ट्रीटवरील ‘ग्रँड अॅस्टोरिया’ हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून सुरक्षित परतीची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित कुटुंबांची माहिती घेण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, या प्रकरणी नातेवाईकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नसल्याचे समजते.

सध्याच्या घडीला सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असले, तरी परतीच्या प्रवासाबाबत अनिश्चितता कायम आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment