रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार
नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, तर दुसरा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. पहिल्या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारत-वेस्ट इंडिज हा सामना एका अर्थाने ‘क्वार्टर फायनल’ ठरणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पण एका गोष्टीमुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवली आहे. ती गोष्ट म्हणजे पाऊस. जर हा सामना पावसामुळे सामना रद्द झाला, तर त्याचा थेट फटका भारतीय संघाला बसणार आहे.
भारत वेस्टइंडीज सामना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. सुपर ८ फेरीत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेत दोघांचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. हा सामना जिंकणारा संघ चार गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघाला प्रत्येकी १ गुण मिळेल. अशावेळी दोन्ही संघाचे तीन गुण होतील. त्यानंतर रनरेटनुसार एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
पावसाच्या सावटामुळे भारताच्या वाढणार अडचणी
रन रेटबाबत बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिज संघाचा नेट रनरेट भारतापेक्षा जास्त आहे. दोन सामन्यांनंतर भारताचा नेट रनरेट -०.१०० आहे, तर वेस्ट इंडिजचा +१.७९१ आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीचे तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. बीबीसी वेदर आणि अॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता तशी कमी आहे. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अनपेक्षितरीत्या पाऊस झाला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढणार आहेत.







