४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित
नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा आणि यमुना नद्यांबाबत एक अतिशय चिंताजनक जागतिक अहवाल समोर आला आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो फेडरल युनिव्हर्सिटीच्या ताज्या अभ्यासानुसार, जगातील ४६ टक्के नद्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की, त्यातील पाणी आता पिण्यासाठीच नव्हे, तर स्नानासाठीही अयोग्य ठरले आहे. या भीषण यादीत भारताच्या पवित्र नद्यांचा समावेश असल्याने पर्यावरणप्रेमींनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
अहवालानुसार, दरवर्षी गंगेच्या पात्रात सुमारे ६ लाख टन कचरा टाकला जातो. उत्तराखंडमधील ऋषीकेश आणि हरिद्वारसारख्या धार्मिक क्षेत्रांसह डेहराडूनमधील रिस्पना, बिंदाल, आसन आणि ससुआ यांसारख्या एकेकाळच्या मुख्य जलस्रोतांची अवस्था आता प्लास्टिक आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे 'नाल्यां'सारखी झाली आहे. उत्तराखंड सरकारसाठी हे संकट दुहेरी आहे. आगामी चारधाम यात्रा आणि २०२७ चा कुंभमेळा जवळ येत असताना, नद्यांची ही दुरवस्था भाविकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते. कोट्यवधी भाविक गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी येतात; परंतु दूषित पाण्यामुळे त्वचेचे रोग आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पराग मधुकर धकाते यांनी या परिस्थितीवर आणीबाणीच्या स्वरूपात पावले उचलली आहेत. सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांत सोडणाऱ्या कारखान्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. जे व्यावसायिक प्रतिष्ठान कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारी प्रयत्नांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत, तर नागरिकांनीही या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.







