Saturday, February 28, 2026

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील चौथे जहाज चेन्नई बंदरात झालेल्या अधिकृत समारंभात भारतीय नौदलात औपचारिकपणे दाखल झाले आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, पूर्ववर्ती अंजदीप चे माजी कमांडिंग ऑफिसर, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई), कोलकाता आणि लार्सन अँड टुब्रो शिपबिल्डिंग, कट्टुपलीचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नौदल प्रमुखांनी आपल्या भाषणात भारतीय नौदलात जहाजाच्या समावेशाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले, तसेच जहाज बांधणी करणाऱ्यांची वचनबद्धता आणि पाठिंबा तसेच जहाज वेळेवर नौदलाच्या सेवेत दाखल करण्यासाठी जहाजावरील कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली.

कारवारच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रातील ऐतिहासिक बेटाच्या नावावरून आयएनएस अंजदीप हे नाव देण्यात आले असून, समुद्र किनाऱ्या जवळच्या उथळ समुद्रातील पाणबुडीविरोधी युद्धासाठी खास डिझाइन केलेल्या युद्धनौकांच्या मालिकेत या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला आहे. या जहाजाच्या बांधणीसाठी ८०% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला असून, यामधून युद्धनौका डिझाइन आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्समधील भारताची स्वयंपूर्णता दिसून येते. यामध्ये प्रमुख स्वदेशी प्रणालींचे एकत्रीकरण समाविष्ट आहे.

'डॉल्फिन हंटर' म्हणून ओळखले जाणारे, ७७ मीटर लांब, १४०० टन वजनाचे हे जहाज, किनारपट्टी प्रदेशात जलद प्रतिसाद आणि शाश्वत ऑपरेशन्ससाठी तयार केले आहे. पृष्ठभागावरील धोके प्रभावीपणे शोधणे, त्यांचा मागोवा घेणे आणि निष्प्रभ करणे, यासाठी हे जहाज आधुनिक एएसडब्ल्यू संच आणि एकात्मिक प्रगत लढाऊ व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे.

आपल्या पूर्वसुरी आयएनएस अर्नाळा आणि आंद्रोथ नंतर, आयएनएस अंजदीपचे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे, भारतीय नौदलाच्या, आपल्या दर्जात सुधारणा करणे, आणि क्षमता वाढवण्याच्या नियोजित मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी व्यापार मार्गांची आणि किनारी भागातील पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित होईल. देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी हे जहाज तामिळनाडू आणि पुद्दुचेरी नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या परिचालन आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली सोपवण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा