मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे पक्षाच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार :
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदनादायक आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघण्यासारखी नाही. अजित दादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिलंय. त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही मी घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतोच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता आपल्याला शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'राष्ट्रीय अधिवेशन २०२६' यशस्वीरीत्या पार पडले. या अधिवेशनात मला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते सोपवून सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भगिनी-बंधू आणि… pic.twitter.com/HbbJosXvxb
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 26, 2026
इथेच आपली जबाबदारी संपत नाही :
पुढे बोलतांना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की; सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, पण इथेच आपली जबाबदारी संपत नाही. शेतकरी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, दादांनी शेतीसाठी एआय टेक्नॉलॉजी आणली होती, त्यावरही आपल्याला काम करायचं आहे. आता, सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही. मात्र, त्याने दिलेला विचार आणि शिकवण पुढे घेऊन जायची आहे. दादा अचानक गेले आणि मोठमोठ्या सगळ्या जबाबदारीचं ओझ ठेऊन गेले. सगळ्यांच्याच अपेक्षांचं ओझ आणि जाणीव मला आहे. यापुढे महाराष्ट्राचं कल्याण आणि जनतेचे भलं हेच आपलं लक्ष असणार आहे.







