मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. "राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपले मत मांडले आहे. २०२० मध्ये आम्ही फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. मात्र, आमचे उमेदवार संजय पवार हे संख्याबळ असताना सुद्धा पराभूत झाले. आता आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल, तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल", असे ते म्हणाले.
राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होत आहे. विद्यमान संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येईल. या जागेवर शरद पवार यांनी पुन्हा जावे, अशी इच्छा राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) व्यक्त केली जात असतानाच ठाकरे गटाने त्यास नकार दिला आहे. वरुण सरदेसाई यांनी यावेळी २०२० मधील निवडणुकीचा संदर्भ देत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. "२०२० मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, त्यानंतर आमच्याकडे संख्याबळ असतानाही संजय पवार यांचा पराभव झाला. त्या अनुभवातून आम्ही शिकलो आहोत. आता संख्याबळानुसार आमचाच दावा मोठा आहे," असे सरदेसाई म्हणाले.
आदित्य ठाकरेंची बैठकीला 'दांडी'
राज्यसभेच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने बोलावलेल्या दोन बैठकांना आमदार आदित्य ठाकरे यांनी दांडी मारली आहे. जागेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास उबाठा गटाचा विरोध असल्याचे समजते. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरही सरदेसाई यांनी हक्क सांगितला आहे. "उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने रिक्त होणारी विधान परिषदेची जागा आमचीच असेल. राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन्ही स्वतंत्र विषय असून दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल," असेही त्यांनी सांगितले.







