कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कल्याण शहर हादरले आहे. आणखी एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मोहने गाळेगावमध्ये भीषण प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात रस्त्यावर खेळणाऱ्या दोन मुलांवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सात वर्षीय खुशील वाघे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी
घटनेनंतर स्थानिक प्रतिनिधींनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे धाव घेतली. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली. सोसायट्यांच्या आवारातही हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पूर्वीची घटना अद्याप ताजी
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्व भागात ३० वर्षीय आयश विश्वनाथ अमीन याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आवश्यक उपचार पूर्ण न केल्यामुळे त्याला रेबिजची लक्षणे जाणवू लागली आणि भीती आणि त्रासामुळे आत्महत्या केली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस आणि तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत आवश्यक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







