महापालिका सभागृहात ठराव मंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात या खेळाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, मुंबईत मैदाने कमी होत चालल्याने कबड्डी स्पर्धांवर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेच्यावतीने कबड्डी स्पर्धेसाठी अल्प दरात मैदाने उपलब्ध करून देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे.
मुंबईतील मध्यमवर्गीय व गिरणगाव परिसरातील अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तरीही, सध्या योग्य मैदाने उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होत आहेत. सरावाचा अभाव, दुखापतींचे वाढते प्रमाण आणि पारंपरिक मातीत खेळल्या जाणाऱ्या कबड्डीऐवजी कृत्रिम मॅटवरील स्पर्धांचे वाढते प्रमाण, यामुळे खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई शहर व उपनगरांतील कबड्डी संघटनांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी खासगी जागांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धांचे आयोजन कमी प्रमाणात होत असून नवोदित खेळाडू तयार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारितील क्रीडांगणे कबड्डी स्पर्धांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेविक सचिन पडवळ यांनी महापालिका सभागृहात केली होती. या ठरावाच्या सुचनेला मंजुरी महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे याबाबत ठरावच महापालिका सभागृहात पारित करण्यात आला असून प्रशासन आता यासाठी धोरणात्मक निर्णय कशाप्रकारे घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत बोलतांना सचिन पडवळ यांनी, महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घेतल्याने मराठमोळ्या मातीतला हा पारंपरिक खेळ अधिक जोमाने फुलेल, नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. तसेच मुंबईतून पुन्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.