Thursday, February 26, 2026

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढवणाऱ्या माफियांविरोधात महापालिका सभागृहात प्रचंड गरमागरमी झाली. उबाठाच्या नगरसेवकाने फेरीवाला माफियाच्या विरोधात उपस्थित केलेल्या हरकतीच्य मुद्दयाला भाजपनेही पाठिंबा देत फेरीवाल्यांचे माफिया राज कायमच उखडून टाका अशी मागणी सभागृहात केली. रोटी,कपडा मकानचा अधिकार देतानाच शहराचा बेरंग होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. रोटी कपडा मकानची काळजी घेणाऱ्यांनी घ्यावी आम्हाला मुंबईची काळजी असल्याचे सांगत फेरीवाल्यांच्या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान महापौरांनी यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत हा महापौरांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

मुंबई महापालिका सभागृहात उबाठाचे नगरसेवक शैलेश फणसे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे फेरीवाल्यांमधील माफियाराजवर चिंता व्यक्त करत प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी मुंबईतील काही भाग फेरीवाला मुक्त करण्याची घोषणा केली असे सांगत फणसे यांनी मुंबईत जसे भूमाफिया असतात तसेच आता फेरीवाला माफिया तयार आहेत. वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी उद्यानाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे.नागरिकांना उद्यात शिरता येत नाही. आणि या फेरीवाल्यांचे माफिया आता ऑफिस टाकून बसले आहेत. त्यांना तीन ते चार नोटीस देवूनही त्यांच्या कार्यालयावर कारवाई झालेली नाही. त्यांचे रॅकेट एवढे आहेत, त्यांच्या फेरीवाल्यांचे सामान आणि हातगाडी तात्काळ सोडली जाते. त्यामुळे महापालिका कारवाई करत असताना या माफियांवर कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी माफियांवर न बोलता फेरीवाल्यांवरील कारवाईमुुळे त्यांचे संसार चालणार नसल्याबाबत चिंता व्यक्त केली.

यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी उबाठाच्या फणसे यांच्या हरकतीच्या मुद्दयाला राष्ट्रभक्त नागरिक म्हणून मी याला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. परवाना विभागाचे अधिकारी यांची माफियांसोबत मिलीभगत असल्याचे सांगत शिंदे यांनी फेरीवाल्यांकडून महापालिकेच्या तिजोरीत येणार पैसा माफियांकडे जात आहे. त्यामुळे यापूर्वी ज्याप्रकारे ट्रेड रिफ्युज चार्जेस आकारायचो, त्याच धर्तीवर पुन्हा फेरीवाल्यांकडून हे शुल्क वसूल करावे जेणेकरून महापाालिकेच्या तिजोरीत याचा महसूल जमा होईल. हे फेरीवाल्यांचे माफिया मुंबईचे चित्र असून भविष्य लोकसंख्येचे चित्र बदलण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगत शिंदे यांनी फेरीवाल्यांच्या माफियांवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली.

शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी मुंबईकरांना पदपथ चालण्यासाठी चांगल्या दर्जाचे बनवण्याची स्वप्ने दाखवली जात आहे. पण सध्या पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होणार नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल केला. शिवसेनेच्या संध्या दोशी यांनी रस्ते अडवून बसलेल्या पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन मोकळ्या जागांवर करून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर उबाठाच्या नगरसेविका आणि माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी रेल्वे स्थानक परिसरासह गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त व्हायला हवी अशी मागणी करतानाच ही कारवाई मुंबईत तीव्र करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांचे अभिनंदन केले. त्यांनाही ही मोहिम राबवताना सुरुवातीला पाठिंबा मिळाला नाही. आयुक्तांचा ना खालच्या अधिकाऱ्यांचा. तरीही त्यांनी कारवाई सुरुच ठेवली. त्यामुळे जिथे कारवाई झाली आहे, तिथे जर पुन्हा फेरीवाले बसत असतील तर तेथील महापालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी भाग घेतला.

Comments
Add Comment