मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.
धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ऑर्केस्ट्रा बारचा परवाना जप्त करणार
राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर सरकारने चाप बसवण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला.
मंत्रालय हे अन्यायाचे केंद्र नाही
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या विधानांचाही पंकज भोयर यांनी समाचार घेतला. "मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे," असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.







